अमरावती : अशोक चव्हाण यांनी काँग्रेस सोडल्यानंतर ते भाजपच्या संपर्कात आहेत. अमरावती जिल्ह्यातील काँग्रेस आमदार हेदेखील भाजपच्या संपर्कात आहेत, असा दावा बडनेराचे अपक्ष आमदार रवी राणा यांनी सोमवारी केला आहे.
अशोक चव्हाण हे अनेक दिवसांपासून भाजपच्या संपर्कात आहेत. काँग्रेसचे अनेक आमदार हे चव्हाण यांच्या संपर्कात आहेत. त्यामुळे आगामी काळात मोठा राजकीय स्फोट होऊ शकतो, अशी शक्यता राणा यांनी वर्तवली. चव्हाण यांनी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्या पार्श्वभूमीवर राणा माध्यमांशी बोलत होते. ठाकरे गटातील अनेक जण भाजपमध्ये जातील, असे सांगत शेवटी केवळ ठाकरे गटामध्ये उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत हेच राहतील, असा टोलाही आ. राणा यांनी लगावला.