![राेहित शर्मा, हार्दिक पंड्या.
(संग्रहित छायाचित्र)](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2024%2F04%2FMI-ROHIT.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
पुढारी ऑनलाईन डेस्क : यंदाच्या इंडियन प्रीमिअर लीग (IPL 2024) स्पर्धेतील सामन्यांबरोबर मुंबई इंडियन्स संघाच्या कर्णधार बदलाची चर्चाही अजुनही सुरु आहे. रोहित शर्मा याची उचलबांगडी करत हार्दिक पंड्याकडे कर्णधारपदाची धुरा देणे चाहत्यांच्या पचनी पडलेले नाही. यावरुन सोशल मीडियासह मैदानातही चाहत्यांचा राडा सुरुच आहे. आता साेमवार, १ एप्रिल राेजी राजस्थानविरुद्धच्या पराभवानंतर मुंबईचे कर्णधारपद रोहित शर्माकडे सोपवले जाऊ शकते, असा दावा करत भारतीय क्रिकेट संघाचा माजी फलंदाजाने करत या चर्चेला नवी उकळी दिली आहे. ( IPL 2024, MI captaincy row )
रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखाली मुंबईच्या संघाने पाचवेळा IPL चषकावर आपली मोहर उमटवली होती. मात्र यंदाच्याा हंगामात अष्टपैलू हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली संघाला सलग तीन पराभवाला सामोरे जावे लागले आहे. गुजरात संघाचा कर्णधार असणारा पंड्याकडे यंदा मुंबईचे नेतृत्त्व सोपवले गेले. पंड्याने गुजरात संघाला 2022 मध्ये आयपीएलचे जेतेपद मिळवून दिले होते. तर २०२३ मध्ये त्याच्या नेतृत्त्वाखाली गुजरात संघाने अंतिम फेरीपर्यंत धडक मारली होती. ( IPL 2024, MI captaincy row )
टीम इंडियाचा माजी फलंदाज मनोज तिवारी याने 'क्रिकबझ'शी बोलताना सांगितले की, "यंदाच्या 'आयपीएल'च्या मोसमात मुंबईच्या संघाची खराब सुरुवात झाली आहे. त्यामुळे रोहितला पुन्हा एकदा मुंबई संघाचा कर्णधार बनवले जाऊ शकते. मुंबई इंडियन्सचे मालक निर्णय घेण्यास मागेपुढे पाहत नाहीत हे मला समजले आहे. रोहितने त्यांच्यासाठी पाच आयपीएल विजेतेपदे जिंकली असूनही त्यांनी रोहितकडून कर्णधारपद काढून हार्दिक पांड्यला नेतृत्त्वाची संधी दिली होती." ( IPL 2024, MI captaincy row )
स्पर्धा सुरु असताना कर्णधार बदलणे खूप मोठे आव्हान आहे. या मोसमात मुंबई संघाच्या नावावर एकही गुण मिळालेला नाही. कर्णधारपद ही मोठी जबाबदारी आहे, असेही तिवारी म्हणाला.
हेही वाचा :