कोल्हापूर; विशेष प्रतिनिधी : उपवर मुलांना वेगवेगळ्या समाज माध्यमांवरील जाहिरातींच्या माध्यमातून हजारो रुपयांना गंडा घालण्याचे प्रकार वाढले असून, अशी अनेक प्रकरणे समोर येत आहेत. फसगत होऊनही केवळ लग्नाच्या आशेने हजारो लग्नाळू तरुण सापळ्यांमध्ये नव्याने अडकताना दिसत आहेत. सर्व बाबींची खात्री झाल्याशिवाय संबंधितांशी कोणताही व्यवहार करणे धोकादायक ठरत आहे. (Marriage Problems)
आजकाल सर्वच समाजात मुला-मुलींचे गुणोत्तर प्रमाण अतिशय विषम आहे. दरहजारी मुलांच्या प्रमाणात मुलींचे प्रमाण नऊशेपर्यंत खाली घसरलेले दिसत आहे. विवाहयोग्य तरुणींच्या आणि तिच्या पालकांच्या वराकडून आणि वर पक्षाकडून असलेल्या डोंगराएवढ्या अपेक्षांमुळे वयाची चाळीशी गाठली, तरी अनेकांची लग्ने जमेना झाली आहेत. आठ-दहा वर्षे खर्च करून, मुली बघण्यासाठी लाखो रुपयांचा चुराडा करून आणि हजारो मुलींच्या घरांचे उंबरठे झिजवूनही मुलांना लग्नासाठी मुलगी मिळणे दुरापास्त होऊन बसले आहे. नेमक्या या परिस्थितीचा गैरफायदा घेण्यासाठी काही जण सरसावलेले दिसत आहेत. उपवर वरांना जाळ्यात अडकविण्यासाठी या मंडळींनी वेगवेगळी माध्यमे, समाज माध्यमांवर सापळे लावलेले दिसत आहेत. (Marriage Problems)
लग्नाच्या बाजारात आजकाल अजिबातच मागणी नसलेला घटक कोणता असेल तर तो म्हणजे शेतकरी, उपवर शेतकरी मुलाला लग्नासाठी सहजासहजी मुलगी मिळणे महाअवघड होऊन बसलेले आहे. त्यामुळे माध्यमातून प्रसिद्ध केलेल्या बहुतांश फसव्या जाहिरातीमध्ये अगदी आवर्जून 'शेतकरी मुलगा चालेल' असे नमूद केले जाते. त्यामुळे साहजिकच मोठ्या प्रमाणात उपवर शेतकरी मुले या जाहिरातींकडे वळतात आणि लग्नाच्या आशेने हजारो रुपये गमावून बसताना दिसत आहेत. (Marriage Problems)