543 सदस्यांचे संख्याबळ असलेल्या लोकसभेत एकट्या भाजपचे 303 खासदार आहेत. थोडक्यात, भाजपकडे पूर्ण बहुमत असल्याने अविश्वास प्रस्तावावेळी काय होणार, हे सांगण्याची काहीच गरज नाही. विरोधी इंडिया आघाडीतले सर्व पक्ष अविश्वास प्रस्ताव आणण्याच्या बाजूने होते, असे सुरुवातीला काँग्रेसकडून सांगण्यात आले; मात्र आम्हाला विचारात घेतले नाही, अशी तक्रार काही विरोधी पक्षांनी केल्यानंतर काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना सारवासारव करावी लागली. इंडिया आघाडीतले तमाम पक्ष सरकारच्या विरोधात मतदान करतील, यात काही शंका नाही; पण कोणत्याही आघाडीत सामील नसलेले राजकीय पक्ष कोणती भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 'एकला चलो रे' धोरणानुसार चालणार्या या पक्षांमध्ये तेलगू देसम पार्टी, बिजू जनता दल, वायएसआर काँग्रेस, अकाली दल आणि बहुजन समाज पार्टी यांचा समावेश आहे. यातील वायएसआरने सरकारच्या बाजूने मत देण्याचा निर्णय घेतला आहे. वायएसआरचे लोकसभेत 22 खासदार आहेत. विशेष म्हणजे, याआधीही या पक्षाने अनेकदा मोदी सरकारला साथ दिलेली आहे.