![Manipur Violence Again](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2023%2F09%2FManipur-Violence-Again-New.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
पुढारी ऑनलाईन डेस्क: मणिपूरमध्ये पुन्हा हिंसक घटना घडली आहे. जुलैपासून बेपत्ता झालेल्या दोन विद्यार्थ्यांची हत्या करण्यात आली आहे. या दोघांच्या मृतदेहाची छायाचित्रे समोर आली आहेत. यामध्ये दोन्ही विद्यार्थ्यांचे मृतदेह जमिनीवर पडलेले दिसत आहेत. मात्र, दोन्ही विद्यार्थ्यांचे मृतदेह अद्याप सापडलेले नाहीत, असे वृत्त 'इंडिया टुडे' ने दिले आहे. (Manipur Violence Again)
मणिपूरच्या मुख्यमंत्री कार्यालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, 'जुलैमध्ये बेपत्ता झालेल्या दोन विद्यार्थ्यांच्या मृतदेहांची छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याचे राज्य सरकारच्या निदर्शनास आले आहे. 17 वर्षीय हिजाम लिंथोइंगम्बी आणि 20 वर्षीय फिजाम हेमजीत अशी या दोन विद्यार्थ्यांची नावे आहेत. हे प्रकरण आधीच सीबीआयकडे सोपवण्यात आले आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोंमध्ये दोन विद्यार्थी एका सशस्त्र गटाच्या वन कॅम्पच्या गवताच्या आवारात पडलेले दिसत आहेत. विद्यार्थी बेपत्ता झाल्याच्या आजूबाजूच्या परिस्थितीचा शोध घेत, मणिपूर पोलिस केंद्रीय सुरक्षा संस्थांच्या सहकार्याने या प्रकरणाचा सक्रियपणे तपास करत आहेत,असेही निवेदनात म्हटले आहे.
या प्रकरणी मणिपूर सरकारने सांगितले की, जे कोणी मारेकरी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. सध्या या प्रकरणाचा तपास सीबीआय करत आहे. जुलै महिन्यात दोन्ही विद्यार्थी एका दुकानात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसले होते, मात्र त्यानंतर ते बेपत्ता झाले होते, त्यानंतर त्यांचा शोध सुरू होता, दरम्यान ते मृत झाल्याची घटना समोर आली आहे. या दोन्ही मुलांच्या मृतदेहाची छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.(Manipur Violence Again)
बेपत्ता मुलांच्या हत्येचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर ते तातडीने सीबीआयकडे सोपवण्यात आल्याचे राज्य सरकारने सांगितले. या घटनेतील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा दिली जाईल. गुन्हेगारांना पकडण्यासाठी सुरक्षा दलांनी शोधमोहीमही सुरू केली आहे. सरकारने जनतेला शांतता राखण्याचे आणि तपास अधिकाऱ्यांना त्यांचे काम करू देण्याचे आवाहनही केले आहे.
मणिपूरमध्ये गेल्या ४ महिन्यांपासून सुरू असलेल्या जातीय हिंसाचारात आतापर्यंत १७५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ११०० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. एवढेच नव्हे तर जाळपोळीचे ५१७२ गुन्हे नोंदवण्यात आले असून, त्यात ४७८६ घरे आणि ३८६ धार्मिक स्थळांची जाळपोळ आणि तोडफोड करण्यात आली आहे.