पुढारी ऑनलाईन डेस्क : 'दार उघड बये' या नव्या मालिकेचा प्रोमो झी मराठीवर प्रदर्शित झाला आणि त्याच वेळी चर्चा होऊ लागली ती माझी तुझी रेशीमगाठ मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार. 'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेच्या शेवटच्या टप्प्यातले शूटिंग केल्याची पोस्ट कलाकारांनी सोशल मीडियावर शेअर केल्या. या पोस्टनंतर अनेक प्रेक्षकांनी मालिका बंद होण्याबाबत प्रश्न विचारले. ही मालिका सुरु झाल्यापासून त्यातील कलाकार मंडळी कायम चर्चेत होती मग तो यशवर्धन, समीर असू दे, नेहा किंवा छोटी परी. पण अचानक मालिका बंद होण्याचा निर्णय घेण्यात आल्याने मालिकेचे चाहते नाराज झाले आणि सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया उमटू लागल्या.
आता चाहत्यांसाठी एक खुशखबर आहे. या सगळ्यांची दखल घेत वाहिनीने आणि निर्मात्यांनी मालिका बंद न करण्याचा निर्णय घेतलाय. प्रेक्षकांची आवडती माझी तुझी रेशीमगाठ मालिका बंद होणार नसून या मालिकेची वेळ बदलण्यात आली आहे, ही मालिका झी मराठीवर १९ सप्टेंबरपासून नव्या वेळेत म्हणजेच संध्याकाळी ६.३० वा. प्रसारित होणार आहे.