बेळगाव : पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र -कर्नाटक सीमाप्रश्नी सर्वोच्च न्यायालयात बुधवारी (दि.१) महत्वाची सुनावणी होणार आहे. तब्बल वर्षभरानंतर ही सुनावणी होत असून कर्नाटकच्या सीमाप्रश्न कालबाह्य असल्याच्या दाव्यावर ही सुनावणी होण्याची शक्यता आहे. सीमाप्रश्नी गेल्या तीन वर्षांपासून सर्वोच्च न्यायालयात सुनावणी रेंगाळली आहे. (Maharashtra-Karnataka border row)
या खटल्यात त्रिसदस्यीय खंडपीठाची रचना करण्यात आली आहे. पण सातत्याने यामध्ये महाराष्ट्र किंवा कर्नाटकातील न्यायमूर्ती नियुक्त करण्यात येत होते. त्यामुळे नैतिकतेच्या मुद्द्यावर या खटल्याची सुनावणी होऊ शकलेली नाही. त्यामुळे महाराष्ट्र एकीकरण समितीने सातत्याने महाराष्ट्र सरकारकडे पाठपुरावा करत होती. न्यायालयाला तटस्थ न्यायमूर्ती नेमण्यात यावेत, अशी मागणी केली होती. त्यानुसार अखेर बुधवारी ही सुनावणी होणार आहे. (Maharashtra-Karnataka border row)
सर्वोच्च न्यायालयाच्या संकेतस्थळावर दिलेल्या माहितीनुसार बुधवारी (दि. 1 नोव्हेंबर रोजी) सीमाप्रश्नावर सुनावणी होणार आहे. या सुनावणीत न्यायमूर्ती संजय किशन कौल, न्यायमूर्ती सुधांशू धुलिया आणि न्यायमूर्ती प्रशांत कुमार मिश्रा यांच्या समोर सुनावणी होणार आहे. सीमाप्रश्नी या आधी 22 डिसेंबररोजी सुनावणी होणार होती. पण खंडपीठात कर्नाटकचा न्यायमूर्ती नियुक्त केल्यामुळे सुनावणी होऊ शकली नाही. त्यामुळे आता होणाऱ्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
या सुनावणीत प्रामुख्याने तीन अंतरिम अर्जावर सुनावणी होण्याची शक्यता आहे. त्यामध्ये सीमाप्रश्नी कर्नाटकाने महाराष्ट्राचा दावा कालबाह्य झाला आहे, असा अर्ज केला आहे. त्यावरील सुनावणी महत्वाची असणार आहे. महाराष्ट्राच्या बाजूने ज्येष्ठ विधीज्ञ हरिष साळवे उपस्थित राहणार का, हेही पाहावे लागणार आहे.
हेही वाचा