मुंबई; पुढारी वृत्तसेवा : बारावीच्या परीक्षेस बुधवारपासून सुरुवात झाली असली, तरी राज्यातील शिक्षकांनी शिक्षण विभागाने प्रलंबित मागण्या पूर्ण न केल्याने यावर्षी पुन्हा उत्तरपत्रिका तपासणीच्या कामावर बहिष्कार घातला आहे. मंडळाच्या अधिकार्यांना मुख्य नियामकांनी उत्तरपत्रिका तपासणीच्या पहिल्याच बैठकीवर बहिष्कार घालत असल्याचे निवेदन दिले. गेली कित्येक वर्षे अपूर्ण असलेल्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशाराही दिला आहे. (HSC Exam 2024)
परीक्षेच्या पहिल्या दिवसापासूनच उत्तरपत्रिका तपासणीच्या प्रक्रियेस सुरुवात केली जाते. मुख्य नियामक यांची बैठक घेऊन उत्तरपत्रिका तपासणीबाबत संबंधितांना सूचना दिल्या जातात. मात्र, या बैठकीवरच बहिष्कार घालण्यात आला. त्यामुळे उत्तरपत्रिका तपासण्याचे काम थांबले आहे. महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक महासंघाचे सरचिटणीस संतोष फाजगे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. गतवर्षी लेखी आश्वासनानंतर महासंघाने बहिष्कार मागे घेतला होता. (HSC Exam 2024)