महाड; पुढारी वृत्तसेवा : शासनाच्या दुर्लक्षामुळे मागील पाच महिने महाड पुराचा प्रश्न व उपाययोजना प्रलंबीतच राहिल्या आहेत. चिपळूणमध्ये एक न्याय व महाडमध्ये एक न्याय दिला गेल्याने आज (दि.०४) शुक्रवारी व्यापारी संघटना, महाड पूर निवारण समिती व नागरिकांच्या सहकार्याने बंद पाळण्यात आला होता. (Mahad)
या बंदला महाडकरांनी उदंड प्रतिसाद दिला असून गांधारी नाकावरून सकाळी १० वाजता निघालेल्या मोर्चाच्या माध्यमातून घोषणांच्या देत पूर मुक्त महाडचा निर्धार करण्यात आला.
सकाळी १० वाजता गांधारी नाका येथे महाडकरांनी एकत्र येत मोर्चा काढला. पाणी आले गळाशी, नदी गेली तळाशी अशा घोषणा देत ठिकठिकाणी स्वातंत्र्य वीरांना पुष्पहार अर्पण करण्यात आले. त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज चौकात महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. सदरचा मोर्चा बाजारपेठ मार्गे नवेनगर कॉनर मार्गे महाड उपविभागीय कार्यलय पर्यंत काढण्यात आला.
मागील वर्षी बावीस आणि तेवीस जुलै रोजी आलेल्या महाप्रलयानंतर गेल्या पाच महिन्यांपासून शासनाकडून निर्धारित केलेल्या सावित्री नदी पात्रातील गाळ काढण्यास आलेल्या अपुऱ्या यंत्रणेच्या विरोधात वीरेश्वर मंदिराच्या सभागृहामध्ये बैठक झाली. या झालेल्या बैठकीत महाडमधील व्यापारी संघटनांचे प्रतिनिधी, महाडकर नागरीक व पूर निवारण समितीच्या सदस्यांमध्ये सुमारे एक तासाच्या चर्चा झाली.
या चर्चेनुसार आज (दि.०४) सकाळी दहा वाजता गांधारी नाका येथून प्रांत कचेरीवर मोर्चा नेण्यात आला. बैठकीमध्ये महाड पूर निवारणासंदर्भात तातडीने यंत्रणा पाठविण्याचा निर्णय होत नाही, तोपर्यंत हा बंद सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.
यावेळी महाडकरांसह महाड पूर निवारण समितीचे सर्व सदस्य, डॉक्टर, मेडिकल धारक, कपडे, किराना व्यवसाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी विकास गोगावले, नितीन पावले, प्रदीप मेहता, दिनेश जैन, सुधीर शेठ, प्रकाश पोळ, बिपिन महामुणकार, सुनील अगरवाल, सुहास तलाठी, संदीप जाधव आदींसह जेष्ठ नागरिक, महिला मोठ्या संस्थेने उपस्थित होत्या.