![मध्य प्रदेश : ट्रक चालकाची ‘औकात’ काढणा-या ‘त्या’ कलेक्टरवर बदलीची कारवाई](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2024%2F01%2Fmp.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
पुढारी ऑनलाईन डेस्क : ट्रक चालकांच्या आंदोलनादरम्यान एका चालकाला तुझी 'औकात' काय अशी विचारणा करणारे शाजापूरचे जिल्हाधिकारी किशोर कन्याल यांना महागात पडले आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी कन्याल यांच्या बदलीचे आदेश दिले आहेत. मुख्यमंत्री यादव यांनी बुधवारी कन्याल यांना जिल्हाधिकारी पदावरून हटवण्याचा निर्णय जाहीर केला. यावेळी त्यांनी अशी भाषा खपवून घेतली जाणार नाही, असा सज्जड दम प्रशासनाला भरला आहे.
मध्य प्रदेश मुख्यमंत्री कार्यालयाने (सीएमओ) दिलेल्या माहितीनुसार, सीएम यादव यांच्या सूचनेवरून कन्याल यांना शाजापूर जिल्हाधिकारी पदावरून हटवण्यात आले. कन्याल यांची राज्य उपसचिव पदावर बदली करण्याचा आदेश राज्य सरकारने बुधवारी जारी केला. नरसिंगपूरचे जिल्हाधिकारी रिजू बाफना यांना शाजापूरचे नवे जिल्हाधिकारी बनवण्यात आले आहे. मंगळवारी ट्रक चालक युनियनच्या प्रतिनिधींसोबत झालेल्या बैठकीत कन्याल यांचा संयम सुटला होता. यावेळी त्यांनी रागाच्या भरात चालकाला तुझी 'औकात' काय? अशी विचारणा केली होती. या वक्तव्याचा तिव्र निषेध करण्यात आल्यानंतर जिल्हाधिका-यांनी दिलगिरी व्यक्त केली होती.
या प्रकरणावर बोलताना मुख्यमंत्री यादव म्हणाले, 'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आम्ही गरिबांच्या उन्नतीसाठी काम करतो. अधिकारी कितीही मोठा असला तरी त्याने गरिबांच्या कामाचा आणि भावनांचा आदर केला पाहिजे. आमच्या सरकारमध्ये अशी भाषा खपवून घेतली जाणार नाही.'
मंगळवारी व्हायरल झालेल्या एका व्हिडिओ क्लिपमध्ये जिल्हाधिकार्यांनी ट्रक चालक आणि इतरांना कायदा हातात घेऊ नका असे दरडावले. त्यानंतर चालकांच्या प्रतिनिधीने निट बोलण्यास सांगितले. यावर जिल्हाधिकारी कन्याल संतापले आणि त्यांनी संबंधित व्यक्तीला 'तुम्ही औकात काय आहे?' अशी विचारणा केली.