पुढारी ऑनलाईन डेस्क : Lok Sabha Dailyhunt Trust of Nation Survey : आगामी सार्वत्रिक निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए आघाडी विजयी होईल. तसेच पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांनाच पहायचे आहे, असे ठाम मत देशातील 64 टक्के लोकांनी व्यक्त केले आहे. डेलीहंट ट्रस्ट ऑफ नेशनच्या सर्वेक्षणात ही माहिती समोर आली आहे. अशा स्थितीत सर्वेक्षण अहवाल पाहून काँग्रेसला धक्का बसू शकतो.
डेलीहंटने 11 भाषांमध्ये केलेल्या लोकसभा निवडणूक 2024 च्या सर्वेक्षणात एकूण 77 लाख लोकांचा सहभाग नोंदवून त्यांचे मत जाणून घेतले. सध्याच्या सरकारच्या कामावर जनता किती समाधानी आहे हे जाणून घेणे हाही या सर्वेक्षणाचा उद्देश होता. सर्वेक्षणाचे जे निकाल समोर आले आहेत ते सध्या मोदी सरकारच्या बाजूने आहेत. 61 टक्के लोकांनी पीएम मोदींच्या कामावर समाधान व्यक्त केले आहे. यावेळीही लोकसभा निवडणुकीत एनडीएला बहुमत मिळेल असा 63 टक्के लोकांचा विश्वास असल्याचेही या सर्वेक्षणातून समोर आले आहे. (Lok Sabha Dailyhunt Trust of Nation Survey)
सर्वेक्षणातील पाचपैकी तीन जणांनी नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान होतील असे म्हटले आहे. फक्त 21.8 टक्के लोकांना राहुल गांधी पंतप्रधान व्हावेत असे वाटते.
सर्वेक्षणातील तीनपैकी दोन लोकांनी भाजप प्रणित एनडीए युती पुन्हा सत्तेत येईल असे मत नोंदवले आहे.
दिल्लीतील सर्व्हेक्षणात पंतप्रधान पदासाठी मोदी यांना 57.7% लोकांनी पसंती दिली आहे. तर राहुल गांधींना 24.2%, तर योगी आदित्यनाथ यांना 13.7% मते मिळाली.
डेली हंटच्या सर्वेक्षणात यूपीमध्ये यंदाच्या निवडणुकीत पीएम मोदींना पहिली पसंती आहे. त्यांना 78.2% मते मिळाली. तर राहुल गांधी यांना 10 टक्के मते मिळाली आहेत.
सर्वेक्षणात पंतप्रधान मोदींना पश्चिम बंगालमध्ये 62.6% मते मिळाली, राहुल गांधींना 19.6% आणि प्रादेशिक नेत्या ममता बॅनर्जी यांना केवळ 14.8% मते मिळाली.
तामिळनाडूमध्ये राहुल गांधींना 44.1 टक्के तर नरेंद्र मोदींना 43.2 टक्के लोकांनी पाठिंबा दिला आहे.
केरळमध्ये मोदी आणि राहुल यांच्यात चुरशीची लढत दिसत आहे. या सर्वेक्षणात पीएम मोदींना 40.8% आणि राहुल गांधींना 40.5% मते मिळाली.
तेलंगणामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींना 60.1% तर काँग्रेसचे राहुल गांधी यांना केवळ 26.5 टक्के मते मिळाली आहेत. तर एन. चंद्राबाबू नायडू यांना केवळ 6.6% मते मिळाली.
आंध्र प्रदेशात पंतप्रधान मोदींना 71.8 टक्के, राहुल गांधींना 17.9% मते मिळाली तर एन. चंद्राबाबू नायडू यांना केवळ 7.4% मते मिळाली.
परराष्ट्र धोरणाबाबतही करण्यात आलेल्या सर्वेक्षणात 64 टक्के लोकांनी एनडीएच्या कामावर समाधान व्यक्त केले आहे.