नारायणगाव : पुढारी वृत्तसेवा : जुन्नर – आंबेगाव तालुक्यातील साखर कारखाने सुरू झाल्याने उसाची तोडणी सुरू झाली आहे. या ऊसतोडणी मजुरांना आणि त्यांच्या लहान मुलांना बिबट्याचा फार मोठा धोका असून, त्या संदर्भात काळजी घेण्याची गरज आहे.
जुन्नर तालुक्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून बिबट्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ऊसतोडणी मजुरांना भल्या सकाळी उसाची तोडणी करावी लागते,हे बिबट्याचा धोका पत्करून जीव धोक्यात घालून तोडणी करत आहेत. या मजुरांसोबत त्यांची लहान मुलेदेखील असतात. या लहान मुलांना उसाच्या सरीमध्येच हे मजूर बसवतात. तेथेच साडीची झोळी करून या झोळीमध्ये मुलांना झोपवतात. बिबट्यांना लपायचं क्षेत्र म्हणजे ऊसच. याच उसाची तोडणी करताना उसाच्या सरीमध्येच लहान मुलांना हे मजूर ठेवत असल्यामुळे जर बिबट्या उसामधून बाहेर आला आणि एखादं लहान मुल पळवलं व त्यातून काही अनर्थ घडला तर याला जबाबदार कोण? असाच सवाल विचारला जात आहे.
पोटासाठी आम्ही काम करतोयफआमचं लहान मुलांकडे लक्ष आहेच परंतु त्यातून ही काही घडू शकते; परंतु कामच केले नाही तर पोटाला काय खायचं? घेतलेलं कर्ज कसं फेडायचे? असा उलट सवाल हे मजूर करीत आहेत. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच आळे येथे अंगणात खेळत असलेल्या शिवांश भुजबळ या दोन वर्षांच्या बाळाला बिबट्याने उसाच्या शेतात पळून नेऊन ठार केल्याची घटना ताजीच आहे. ऊसतोडणी करणारे मजूर स्वतःचा आणि आपल्या लहान मुलांचा जीव धोक्यात घालून भल्या पहाटेच उसाची तोडणी करताना आपल्याला दिसत आहेत. संबंधित साखर कारखाने वनविभाग या संदर्भामध्ये काही उपाययोजना करता येईल का, याबाबतचा विचार करतील अशी अपेक्षा.
हेही वाचा :