Janmashtami 2023 | भगवान श्रीकृष्ण आले होते कोल्हापुरात, काय सांगते करवीर महात्म्य?

Janmashtami 2023 | भगवान श्रीकृष्ण आले होते कोल्हापुरात, काय सांगते करवीर महात्म्य?

आपल्या सगळ्यांनाच प्रश्न पडला असेल की मथुरेत जन्मलेला द्वारकेचा राणा भगवान श्रीकृष्ण कोल्हापुरात आला कधी? त्यांचा आणि कोल्हापूरचा संबंध काय? तर या विषयी हरिवंशपुराण आणि करवीर महात्म्य या दोन ग्रंथांत फार सुंदर उल्लेख मिळतात. करवीर महात्म्य उल्लेखाप्रमाणे भगवान श्रीकृष्ण दोन वेळेला कोल्हापुरात आले. एकदा बलरामा सोबत कालयवन वधासाठी आणि दुसऱ्या वेळी आपल्या सोळा सहस्त्र स्त्रियांच्या मानसिक पापाच्या परिवारासाठी. हरिवंशात मात्र भगवान एकदाच कोल्हापुरात आले तेही कालयवन राक्षसाच्या वधावेळेला असा उल्लेख आहे.

कंसाचा सासरा असलेल्या जरासंधाने श्रीकृष्णाचा सूड घेण्याच्या उद्देशाने सतरा वेळेला मथुरेवर आक्रमण केले. पण सतराही वेळा तो पराजित झाला. यामध्ये मथुरेचे अतोनात नुकसान झाले. अठराव्या वेळी मात्र त्याने कालयवन नावाच्या दुष्ट दैत्याला पाचारण केले हा दैत्य गांधार देशाच्या पलीकडून आला असा उल्लेख आहे. अशा कालयवनाला रणांमध्ये लढण्याचा दांडगा अनुभव होता. त्यामुळे सर्व मथुरावासी यांनी भगवंतांना सांगितले की कालयवनाचे वैर हे तुमच्याशी आहे, मथुरेच्या बाकी जनांशी नाही तेव्हा योग्य तो निर्णय करा. भगवंतांनी युद्धाला आव्हान दिले आणि आपला रथ कालयवन त्याच्यासमोर येऊन उभा केला. कालयवन आलेला बघून भगवान रथातून उतरले आणि रणातून पळत सुटले, असा उल्लेख आहे. यामुळेच भगवान श्रीकृष्णाला 'रणछोड' असे नाव मिळाले. भगवंतानी रण सोडलं खरं पण त्यांनी सह्याद्री पर्वताच्या घनघोर अरण्यामध्ये ओढले आणि त्यांचा पाठलाग करत सध्याच्या विशाळगडाच्या पाठीमागे असलेल्या मुचकुंद नावाच्या राजाच्या गुहेत शिरले. मुचकुंद राजाला वरदान होते की जो कोणी त्यांची झोप मोडेल तो जळून भस्म होईल. भगवंत गुहेत आले आणि त्यांनी आपला शेला मुचकुंद राजावर पांघरला कालयवनाने रागाने कृष्ण समजून मुचकुंदाची झोपमोड केली आणि तो जळून भस्म झाला.

करवीर महात्म्य कथेप्रमाणे इथे येताना भगवान श्रीकृष्णांनी गाय रुपी रंभेचा उद्धार केला तो परिसर म्हणजे केखले आणि जाखले. तसेच कालयवनाबरोबर युद्ध करताना भगवंताने मारलेल्या उडीमुळे पर्नाळपर्वत दोन योजन खाली आला, असा उल्लेख आहे. आजही जाखले गावात गोपालेश्वराचे मंदिर आहे. पुढे करवीर महात्म्य मधील कथेप्रमाणे भगवान श्रीकृष्णाच्या सोळा सहस्त्र राण्यांच्या हातून काही मानसिक पाप घडले. त्याची निष्कृती करायला भगवान आपल्या परिवारासह करवीरात आले. इथे आल्यानंतर आज जयंती आणि गमतीचा संगम असलेल्या म्हणजे हुतात्मा पार्कच्या परिसरात त्यांनी वास्तव्य केले. इथे जणू प्रती द्वारका तयार झाली या द्वारकेला पाहून या द्वारकाधीशाला आणि भगवान शंकरांना एकत्र पाहून नारद मुनी आपला शाप विसरले. अशा ठिकाणी करवीर यात्रा करताना एकवेळ माता देवकीने भगवान श्रीकृष्णाला विनंती केली हे पुत्रा तुझ्या बाळलीलांचे कौतुक अवघ्या जगात गायलं जातं, पण तुझी जन्मदाती असूनही मला मात्र हे भाग्य नाही. तेव्हा भगवान श्रीकृष्णाने बाळरूप धारण करून मातेला अगदी पूतना वध आतापासून ते गोवर्धन पर्वताच्या उद्धारापर्यंत सर्व बाळलीला करून दाखवल्या. जिथं भगवंतांनी यमुनेचे खेळ केले ती जागा म्हणजे गोकुळ शिरगाव. जिथं पर्वत उचलला ती जागा गिरगाव याच परिसरात असलेले वसुदेव ग्राम अर्थात वाशी इथे वसुदेव आणि तप केले अशा रीतीने या करवीर क्षेत्राला व्रजभूमीचा महात्म्य प्राप्त करून देणारे भगवान श्रीकृष्ण यांनी आपल्या मुखाने पंचगंगा महात्म्य सांगितले. याशिवाय सर्व पापांचा परिवारासाठी शक्ती चतुष्क म्हणजे एकवीरा, पद्मावती, प्रत्यंगिरा आणि अनुगामिनी, अशा चार देवतांचे दर्शन घेण्याची आज्ञा केली आहे.

भगवंताची ही बाळलीला या क्षेत्री झाली याचा संदर्भ कोणी खोटा म्हणेल तर याला जोडून दुसरा संदर्भ देतो तो म्हणजे माशेल गावच्या देवकी कृष्णाचा. कथेनुसार भगवान श्रीकृष्ण कालयवनाचा वध करण्यासाठी दक्षिणेत आल्यावर माता देवकी आणि संपूर्ण परिवार ओढीनं दक्षिणेला आले. सावळ्या परब्रम्हाला बघून देवकीचा ऊर वात्सल्याने भरून आला. तिने जगदीश्वर श्रीकृष्णाला बाळ रूप कल्पून उचलून घेतलं आणि आपल्या छातीशी धरलं तिथल्या पुराणातल्या उल्लेखानुसार हा प्रसंग करवीरमध्ये घडला म्हणून आजही गोव्यातील माशेल गावी एकमेव अशी देवकीने कडेवर घेतलेल्या बाळकृष्णाची एकमेव मूर्ती आहे. एकूणच या जगात व्यापक श्रीकृष्णाचे करवीरशी अर्थात कोल्हापूर बरोबर देखील अनोखे नाते आहे.

श्रीमातृचरणारविंदस्य दास प्रसन्न सशक्तीकः

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news