Konkan Railway : कोकण रेल्वे 70 टक्के ‘कव्हरेज क्षेत्र के बाहर’!

file photo
file photo

पिंपरी : घाटमाथा अन् त्यातील असंख्य बोगद्यांतून धावणार्‍या कोकण रेल्वेच्या 70 टक्के प्रवासात मोबाईल कव्हरेज मिळत नसल्याची माहिती टेलिकॉम आणि रेल्वे विभागाने केलेल्या संयुक्त तपासणीमध्ये (मोबाईल कव्हरेज ड्राईव्ह टेस्ट) पुढे आली आहे. उपाययोजनांसाठी या तपासणीचा अहवाल दिल्ली टेलिकॉम विभागाला पाठविण्यात येणार आहे.

कोकण रेल्वेमध्ये कव्हरेज मिळत नसल्याच्या तक्रारी मोबाईलधारकांनी टेलिकॉम विभागाला केलेल्या आहेत; तसेच पावसाळ्यात घाटात दरडी पडण्याचा, रेल्वे घसरण्याच्या घटनांवेळी तातडीने संदेश पोहोचविण्यासाठी मोबाईल कव्हरेजची गरज आहे. यासाठी कोकण रेल्वे कार्पोरेशन लिमिटेड आणि टेलिकॉम विभागाने रोहा ते मंगळूर या रेल्वे लोहमार्गावर तांत्रिक पद्धतीने मोबाईल कव्हरेजची तपासणी केली. बीएसएनएल, व्हीआयएल, जीओ आणि एअरटेल या कंपन्यांचे प्रतिनिधीही या तपासणीमध्ये सहभागी होते.

महाराष्ट्रात अधिक समस्या

महाराष्ट्रासह गोवा आणि कर्नाटक या राज्यांतून कोकण रेल्वे धावते. मात्र, घाटमार्ग जास्त प्रमाणात असल्याने मोबाईल कव्हरेजची समस्या महाराष्ट्रातच जास्त असल्याची नोंद झाली आहे. घाटामध्ये तीन ते चार किलो मीटरचे बोगदे आणि एक बोगदा संपताच दुसरा बोगदा सुरू होत असल्याने येथे कव्हरेज मिळत नसल्याचे दिसून आले.

कव्हरेजची गरज काय?

प्रवाशांना संपर्कासाठी, इंटरनेटसाठी मोबाईल कव्हरेजची गरज आहेच. शिवाय, कोकण रेल्वेच्या अतिशय दुर्गम घाटमार्गात पावसाळ्यात दरड पडण्याचे प्रमाण अधिक आहे. दरडी पडून अथवा अपघात झाल्यास तातडीने संपर्कासाठी मोबाईल कव्हरेजची गरज आहे.

टॉवरसाठी कंपन्याही अनुत्सुक

कोकण रेल्वेच्या लोहमार्गामध्ये आजूबाजूला दाट लोकवस्ती नाही. ग्राहक मिळण्याची शक्यता नसल्याने कंपन्या अतिरिक्त टॉवर उभे करण्यास उत्सुक नाहीत. मोबाईल टॉवरची संख्या कमी असल्याने या मार्गावर कव्हरेज मिळत नाही.

रेल्वेच्या यंत्रणेवरच भिस्त

रेल्वेच्या व्हीएचएफ सेट अर्थात वॉकीटॉकी यंत्रणेवरच संवादाची भिस्त आहे. स्टेशन आणि रेल्वे मोटरमन यांच्यामध्ये या यंत्रणेच्या माध्यमातून संवाद होतो. अडचणीवेळी अथवा अपघात घडल्यास याच माध्यमातून माहितीची देवाणघेवाण होत आहे.
कोकण रेल्वे कार्पोरेशन लिमिटेडच्या सहकार्याने टेलिकॉम विभागाने सर्व मोबाईल कंपन्यांसह कोकण रेल्वे मार्गावर कव्हरेची तपासणी केली. ड्राईव्ह टेस्ट टूल्सच्या माध्यमातून व्हाईस आणि डाटा कव्हरेजची तपासणी करण्यात आली. सुमारे 70 टक्के रेल्वे मार्गात कव्हरेज मिळत नसल्याचे दिसून आले असून, पुढील 20 दिवसांत या बाबतचा विस्तृत अहवाल टेलिकॉम दिल्ली मुख्यालयाला पाठविण्यात येणार आहे.
– विनय जांभळी, निदेशक, टेलिकॉम, मुंबई

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news