कोल्हापूर : सतीश सरीकर : कोल्हापूरचे वैभव असलेल्या ऐतिहासिक रंकाळा तलावाचे पुनरुज्जीवन करण्यासाठी महापालिकेने पावले उचलली आहेत. रंकाळा संवर्धनासाठी तब्बल १३ कोटी ४७ लाखांचा आराखडा करण्यात आला आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे तांत्रिक मान्यतेसाठी हा आराखडा पाठविण्यात आला आहे. रंकाळ्यातील पाण्याची गुणवत्ता सुधारण्याबरोबरच तलाव मूळ स्वरूपात राखण्यासाठी विविध कामांचा त्यात समावेश आहे. अमृत योजनेच्या दुसरा टप्प्यांतर्गत निधी मिळणार आहे. केंद्र शासनाचा ३३.३३ टक्के, राज्य शासन ३६.६७ टक्के आणि महापालिका ३० टक्के असा हिस्सा आहे. ही कामे झाल्यानंतर रंकाळ्याला गतवैभव प्राप्त होणार आहे.
आराखड्यांतर्गत तलावातील पाण्याचे प्रदूषण कमी करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. तलावातील कोणत्याही जलचरांना धोका निर्माण होणार नाही अशा पद्धतींचा वापर करून पाण्याची गुणवत्ता वाढविण्यात येणार आहे. रंकाळ्याला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी पदपथ उद्यानाजवळ २८१ मीटर कंपाऊंड वॉल बांधण्यात येणार आहे.
जुन्या दगडाप्रमाणेच हे दगड असणार आहेत. पदपथ उद्यानात २३४ मीटर लांबीचा चालण्याचा ट्रॅक तयार केला जाणार आहे. तांबट कमानीजवळ जनावरे धुण्यासाठी आणि धोबी घाट बांधण्यात येणार आहे. त्याचे सांडपाणी रंकाळ्यात शाम सोसायटी पाईपलाईनद्वारे बाहेर काढून ते ड्रेनेज लाईनला जोडण्यात येणार आहे. त्यामुळे रंकाळ्याचे प्रदूषण होणार नाही, अशी काळजी घेतली जाणार आहे.
कधीकाळी रंकाळा तलावातील पाणी पिण्यासाठी वापरले जात होते. परंतु, कालांतराने शहरात नागरी वस्ती वाढली. रंकाळ्याभोवतीही बेसुमार घरे झाली. उपनगरे वाढली. परिणामी, नागरी वसाहतीमधील सांडपाणी निळेशार पाणी असलेल्या रंकाळ्यात मिसळून ते हिरवेगार बनले. काही वर्षांतच मोठ्या प्रमाणात गाळ साठला जलपर्णीमुळे पाण्याला दुर्गंधी येऊ लागली. जलचर धोक्यात आली आहेत. पावसाने रंकाळा भरला, तर सांडव्यातून पाणी जाण्यासाठी जागा उरलेली नाही. त्यामुळे कधीतरी रंकाळा फुटेल, अशी भीती रंकाळाप्रेमींतून व्यक्त केली जात आहे.
नाल्यातून १२ ते १४ लाख लिटर, देशमुख हॉल नाल्यातून ४ ते ५ लाख लिटर, सरनाईक नाल्यातून ६ ते ७ लाख लिटर आणि परताळा नाल्यातून ५ ते ६ लाख लिटर सांडपाणी मिसळत होते. राष्ट्रीय सरोवर संवर्धन योजनेंतर्गत कोल्हापूर महापालिकेला २००६ मध्ये ९ कोटी निधी मंजूर झाला होता. चारही नाल्यांचे सांडपाणी दुधाळी नाल्याकडे वळविले आहे. या ठिकाणी सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते नदीत सोडण्यात येते. परंतु, अजूनही आहे.
पावसाळ्यात वरील चारही नाले ओव्हरफ्लो होऊन त्यातील सांडपाणी रंकाळ्यात मिसळते. त्यामुळे रंकाळ्याचे पाणी प्रदूषित होऊन पुन्हा रंकाळा हिरवागार दिसत आहे. जलचरांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. तलावाभोवती असलेले संरक्षक कठड्याचे दगड निखळून पडले आहेत.
आराखड्यातील काही महत्त्वाची कामे
पदपथ उद्यानाजवळ कंपाऊंड वॉल 63 लाख
जनावरे धण्यासाठी व धोबी घाट – 9 लाख 55 हजार
धोबी घाटाचे सांडपाणी बाहेर काढणे – 5 लाख 57 हजार
पाणी प्रदूषण रोखून गुणवत्ता सुधारणे – 9 कोटी 25 लाख
सोलर स्ट्रीट लाईट बसवणे – 22 लाख 18 हजार
पदपथ उद्यानात चालण्याचा टॅक- 15 लाख 96 हजार
असा आहे रंकाळा….
बाधकाम सन 1883 ला
पूर्ण एरिया 107 हेक्टर
परिमिती साडेपाच कि. मी.
जलाशय साठा | 44 लाख घनमीटर
रंकाळा तलावाच्या संवर्धनासाठी महापालिकेने १३ कोटी ४७ लाखांचा आराखडा केला आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे तांत्रिक मान्यतेसाठी आराखडा सादर केला आहे. प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी काही दुरुस्ती सुचविल्या आहेत. अमृत योजनेंतर्गत रंकाळ्यासाठी निधी मिळणार आहे.
– हर्षजित घाटगे, जल अभियंता, महापालिका बांधण्यात येणार आहे.