गुडाळ; पुढारी वृत्तसेवा : आगामी विधानसभा निवडणूक मी लढवावी अशी माझ्यावर प्रेम करणाऱ्या तालुक्यातील तमाम जनतेची इच्छा असून, हा जनादेश घेऊन २०२४ ची विधानसभा निवडणूक मी लढविणार आणि जिंकणारच असा विश्वास राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए वाय पाटील यांनी व्यक्त केला.
गुडाळ (ता. राधानगरी) येथे तालुक्यातील नवनिर्वाचित ग्रामपंचायत सरपंच आणि सदस्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भोगावतीचे माजी संचालक महादेवराव कोथळकर हे होते.
राधानगरी मधील सर्वाधिक ग्रामपंचायत सरपंच आणि सदस्य राष्ट्रवादीचे झाले आहेत. हे गेली सत्तावीस वर्षे आपण गावा-गावात आणि वाडी- वस्तीवर संघटनात्मक बांधणी केली, कार्यकर्त्यांना ताकद आणि सन्मानाची पदे दिली त्याचे फळ असल्याचे उद्गारही पाटील यांनी यावेळी काढले.
प्रारंभी उपस्थितांचे स्वागत बिद्रीचे माजी संचालक भिकाजीराव एकल यांनी केले. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष तथा गोकुळचे संचालक प्रा. किसनराव चौगले यांनी प्रास्ताविक भाषणात ए वाय पाटील यांच्या नेतृत्वाला उभारी आणि ताकद देण्यासाठी राष्ट्रवादीच्या सर्व कार्यकर्त्यांनी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे असे आवाहन केले.
या मेळाव्यात तालुक्यातील नवनिर्वाचित ३६ सरपंच आणि सव्वा दोनशेहून अधिक ग्रामपंचायत सदस्यांचे सत्कार ए वाय पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी भोगावतीचे माजी संचालक शिवाजीराव पाटील, बिद्रीचे माजी संचालक नेताजीराव पाटील यांचीही भाषणे झाली.
या मेळाव्यास बाजार समितीचे माजी सभापती सर्जेराव पाटील, भोगावती शिक्षण मंडळाचे अध्यक्ष जयसिंगराव हुजरे, गोकुळचे माजी संचालक फिरोजखान पाटील, जि.प.चे माजी सदस्य विनय पाटील, बिद्रीचे संचालक युवराज वारके, एकनाथ पाटील ,भोगावतीचे माजी संचालक नंदूभाऊ पाटील, संदीप पाटील, अमर पाटील, राजाराम कवडे, मोहन पाटील, गोविंदराव चौगले, नानासो पाटील, संजीवनी कदम, स्वप्निल पाटील, सविता पाटील, दत्तात्रय कोथळकर, प्रकाशराव मोहिते आदी मान्यवरासह राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आभार रामभाऊ इंगळे यांनी मानले.
हेही वाचा