![राजापूर बंधारा पाण्याखाली गेला आहे.](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2022%2F09%2F%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0-%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
कुरुंदवाड; पुढारी वृत्तसेवा: गेल्या चार दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे कृष्णा -पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. आज (दि.११) दुपारी १ वाजता तिसऱ्यांदा कृष्णा नदीवरील राजापूर बंधारा पाण्याखाली गेला आहे. तर पंचगंगेच्या पाणी पातळीत ६ इंचाने वाढ झाली असून तेरवाड व शिरोळ बंधारे पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. संध्याकाळी ५ वाजेपर्यंत दोन्ही बंधारे पाण्याखाली जातील, असे पाटबंधारे विभागाने सांगितले.
तेरवाड बंधाऱ्याजवळ पंचगंगा नदीची पाणी पातळी ३९ फूट ६ इंच झाली आहे. तर कृष्णा नदीची राजापूर बंधाऱ्याजवळ १६ फूट, ४ इंच पाणी पातळी झाली आहे. राजापूर बंधाऱ्यातून ३१ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
कृष्णा-पंचगंगा नदीच्या पाणलोट क्षेत्रात सध्या पावसाची रिपरिप सुरू असल्याने पाणी पातळीत वाढ झाल्याने मळी शेतात कृष्णा पंचगंगेचे पात्र पसरु लागल्याने शेतकऱ्यांची धावपळ सुरू झाली आहे. गवत कापणी करून शेती पंपाच्या मोटारी काढण्यात शेतकरी व्यस्त आहेत. राजापूर बंधाऱ्यावर पाणी आल्याने कर्नाटक राज्याकडे जाण्याचा मार्ग बंद झाला आहे. सायंकाळपर्यंत तेरवाड व शिरोळ बंधाऱ्यावर पाणी आल्यास तेरवाडहून शिरडूनकडे तर कुरुंदवाडहून शिरोळकडे जाण्याचा मधला मार्ग बंद होणार आहे.
हेही वाचलंत का ?