कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : मराठ्यांना आरक्षण नाही तर कोल्हापूर शहरात प्रवेश नाही, अशा घोषणा देत सकल मराठा समाजाने शुक्रवारी सकाळी रेल्वे स्थानकावर पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना अडवून जाब विचारला. आरक्षण मिळत नाही तोपर्यंत कागलमध्ये बसून कारभार करा, असेही आंदोलकांनी त्यांना सुनावले. दरम्यान, पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेऊन नंतर सोडून दिले.
मनोज जरांगे-पाटील यांना राज्य शासनाने आरक्षणासाठी दिलेली मुदत 24 ऑक्टोबर रोजी संपली आहे. परंतु मराठा आरक्षणाचा विषय प्रलंबित आहे. त्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी राजकीय नेत्यांना गाव बंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. शुक्रवारी सकाळी पालकमंत्री मुश्रीफ मुंबईहून नियोजित कार्यक्रमांसाठी कोल्हापुरात आले.
दरम्यान, सकाळी सातपासूनच सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते रेल्वे स्थानकावर थांबले होते. रेल्वे स्थानक परिसरातील पोस्ट ऑफिसमोर आंदोलकांनी मुश्रीफ यांच्या वाहनांचा ताफा अडवला. मराठा आरक्षण नाही तोपर्यंत तुम्हाला कोल्हापुरात प्रवेश नाही, असे ठणकावून सांगत घोषणांनी परिसर दुमदुमून सोडला.
यावेळी मंत्री मुश्रीफ यांनी, जरा धीर धरा, मराठा समाजाला आरक्षण देणारच, असे सांगताच आंदोलक आक्रमक झाले. आजपर्यंत केवळ आश्वासनच देत आला आहात, आरक्षण कधी देणार त्याची तारीख सांगा. जोपर्यंत न्यायालयाच्या पातळीवर टिकणारे आरक्षण मराठा समाजाला मिळत नाही, तोपर्यंत पालकमंत्र्यांना कोल्हापूर शहर बंद करण्यात येणार आहे. ना. मुश्रीफ यांनी कागलमध्ये बसून आपल्या खात्याचे कामकाज करावे, असेही आंदोलकांनी यावेळी सुनावले.
कार्यकर्ते अधिक आक्रमक होत असल्याचे पाहून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. याचवेळी पालकमंत्र्यांचा वाहनांचा ताफा निघून गेला. यानंतर पोलिसांनी आंदोलकांना सोडून दिले. यावेळी पालकमंत्र्यांच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या.
या आंदोलनात अॅड. बाबा इंदुलकर, बाबा पार्टे, विजय देवणे, चंद्रकांत पाटील, अमित अतिग्रे, अविनाश पाटील, निलेश लाड, सुनीता पाटील, सुधा सरनाईक, सुवर्णा मिठारी, पूजा पाटील यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होतेे.