अज्ञातांनी महामार्गालगत फेकून दिलेले धान्य महिलांनी पळवल्याची घटना समोर आली आहे. महामार्गालगत फेकून दिलेले धान्य घेऊन जाण्यासाठी महिलांची झुंबड उडालेली पाहायला मिळाली. पुणे-बंगळूर आशियाई महामार्गालगत कराडजवळ वारुंजी फाटा येथे आज (दि. ३) सकाळी ही बाब समोर आली. रस्त्याकडेला फेकून दिलेले धान्य नेमके कोणी व का फेकले? याबाबत माहिती मिळू शकली नाही.
पुणे-बंगळूर आशियाई महामार्गालगत शनिवारी रात्री अज्ञातांनी सुमारे १५ ते २० पाेती गहू, ज्वारी तसेच इतर धान्य फेकून दिल्याचे निदर्शनास आले.
धान्याची सुमारे २५ ते ३० किलोची पोती रस्त्याकडेला पडली होते. रविवारी सकाळी फिरत्या महिलांच्या लक्षात ही बाब आल्यानंतर त्यांनी पोत्यातील धान्य पिशव्या व इतर साहित्यात भरून नेण्यास सुरुवात केली.
काही वेळातच तिथे इतरही महिला जमा झाल्या. त्या महिलांनी रस्त्याकडेला पोत्यात पडलेले धान्य भरून नेले.
हे धान्य नेमकी कोणी टाकले होते? ते टाकले होते की एखाद्या वाहनातून पडले होते? पडले असते तर ते रस्त्यावर मध्येच पडली असते. अशा स्वरूपाचा तर्कवितर्क लावला जात असून, रस्त्यावर पडलेल्या धान्यविषयी कराडसह परिसरात चर्चा सुरू आहे.