मडगाव; पुढारी वृत्तसेवा : बहुचर्चित जुवारी केबलस्टेड पुलाचा शेवटचा सेगमेंट राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते जोडण्यात आला. हा आधुनिक पूल देशातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात लांब अंतराचा पूल ठरला आहे. सर्व गोमंतकियांसाठी ही अभिमानाची बाब आहे. दक्षिण गोव्याला उत्तर गोव्याशी जोडणारा हा पूल डिसेंबर पूर्वी खुला होईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी केले.
राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री निलेश काब्राल यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्या हस्ते विधीवत पूजा करून शेवटचा सेगमेंट जोडण्यात आला. यावेळी बांधकाम खात्याचे प्रधान मुख्य अभियंते उत्तम पार्सेकर, दिलीप बिल्डकॉनचे अधिकारी, सल्लागार तसेच इतर नागरिक उपस्थित होते.
गेली ५० वर्षे आम्हाला केवळ स्वप्ने दाखवली गेली. निवडणुका जवळ येताच या पुलासाठी पायाभरणी केली जात होती. पण उत्तर आणि दक्षिण गोव्यातील लोकांसाठी अत्यंत गरजेचा असलेला हा पूल अस्तित्वात यायला केंद्र आणि राज्यातील भाजपचे डबल इंजिनचे सरकार सत्तेत यावे लागले. जुवारीवरील या पुलाचे सर्व श्रेय केंद्रीय भूपृष्ठ व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना जाते, असे सांगून सावंत म्हणाले की, मांडवीवर तिसरा समांतर पूल व्हावा, हे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे स्वप्न होते.
या पुलाच्या पायाभरणी पासून ते पूल पूर्ण होईपर्यंत मी जीएसआयडीसीच्या अध्यक्षपदी होतो. विरोधकांनी या पुलाच्या विषयावरून टीका करण्याची एक संधीही सोडली नव्ह्ती. पण पर्रीकर यांनी त्यांचे स्वप्न अस्तित्वात आणून दाखवले. आज त्यांचे दुसरे स्वप्नही सत्यता उतरल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
राज्यातील रस्त्यांच्या विकासासाठी आतापर्यंत २२ हजार कोटींपेक्षा जास्त निधी गोव्याला प्राप्त झाला आहे. जुवारी पुलाच्या कामावर १४३६ कोटी रुपये खर्च झाले आहेत. ३ टप्प्यात पुलाचे काम सुरू करण्यात आले होते. शेवटच्या सेगमेंटचे काम पूर्ण झाल्यानंतर वेर्णा ते बांबोळीपर्यंतची जोडणी दिली जाणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री सावंत यांनी दिली.
जुवारी पुलावरील ते मनोरे पुलाचा भाग नाही. पण त्या मनोऱ्यांसाठी लवकरच निविदा काढली जाणार आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री नीलेश काब्राल यांनी दिली. पुलासाठी काँग्रेसने पायाभरणी केली हिती. त्या हिशोबाने बऱ्याच पूर्वी हा पूल बांधून पूर्ण होणे आवश्यक होते. न केलेल्या कामांचे श्रेय घेण्याची त्यांना सवय आहे, पण जुवारीवरील या पुलावरील संकल्पना २०१४ नंतर आखण्यात आल्याचे स्पष्टीकरण निलेश काब्राल यांनी दिले.
हेही वाचलंत का ?