![जळगाव : दीपनगर वीज निर्मिती केंद्रासमोर मरणदिन साजरा करताना शेतकरी. (छाया: चेतन चौधरी)](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2023%2F06%2F%E0%A4%9C%E0%A4%B3%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5-3.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
जळगाव : पुढारी वृत्तसेवा
दीपनगर वीज निर्मिती केंद्रामुळे भुसावळ परिसरात जल आणि वायू प्रदूषण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. याचा परिणाम शेती क्षेत्रावर होत आहे. त्यात आता तालुक्यात शेती परिसरात भरनियमन सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे केळी बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. दीपनगर वीज निर्मिती केंद्रासमोर शेतकऱ्यांनी मरण दिन साजरा केला.
प्रदूषण आणि भारनियमनामुळे केळी बागा नष्ट होण्याच्या मार्गावर असून, बळीराजा हवालदिल झाला आहे. त्यामुळे आज (दि ५) जागतिक पर्यावरण दिनी पिंप्री सेकम संघर्ष समितीच्या वतीने वीज निर्मिती प्रकल्पाच्या प्रवेशद्वाराला केळीचे खोडं बांधून अनोख्या पद्धतीने मरण दिन साजरा करून निषेध व्यक्त केला. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत चौधरी, पिंप्री सेकम संघर्ष समितीचे अध्यक्ष रमाकांत चौधरी, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राजेंद्र साहेबराव चौधरी, प्रगतीशील शेतकरी रविंदर सिंग चाहेल, पर्यावरण समितीचे संतोष सोनवणे यांसह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.
अन्यथा तीव्र आंदोलन छेडणार…
यावेळी समितीचे चंद्रकांत चौधरी यांनी सांगितले की, महाजनकोने शेतकऱ्यांसाठी एक पाऊल पुढे येऊन २४ तास विजेची मागणी पूर्ण करायला पाहिजे. १५ मे पासून सुरू केलेल्या भारनियमनमुळे केळी पिकाला पाणी मिळत नसल्यामुळे केळीचे घड नष्ट होत आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ नुकसान होत आहे. प्रकल्पबाधित शेतकऱ्यांना एक सामाजिक दायित्व म्हणून नेहमीप्रमाणे सुरळीत वीज पुरवठा देणे गरजेचे आहे. दीपनगर प्रशासनाने दखल घ्यावी, अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.