नवी मुंबई; पुढारी वृत्तसेवा : एपीएमसी घाऊक बाजारात डिसेंबर महिन्याच्या तुलनेत नवीन वर्षात साखरेच्या दरात किलोमागे एक रुपयाची घसरण झाली आहे. घाऊक बाजारात साखर 38 रुपये तर किरकोळ बाजारात 45 रुपये किलो आहे, तर गूळ किलोमागे पाच रुपयांनी महाग झाला असून 80 रुपये किलोवर पोहोचला आहे.
गुळाला मोठी मागणी असल्याचे घाऊक गूळ व्यापारी दिपक शाह यांनी सांगितले. यामुळे येत्या मकरसक्रांतीला तिळगुळावर संक्रांत येणार आहे, तर मार्चपर्यंत घाऊक बाजारात सारखेच्या दरात वाढ होण्याचे कोणतेही संकेत नसल्याची माहिती शुगर मर्चंट असोशिएशनचे अध्यक्ष अशोक जैन यांनी दिली. किरकोळ बाजारात डिसेंबरमध्ये गूळ 75 रुपये किलो होता, तर जानेवारीत किलोमागे पाच रुपयांची दरवाढ होऊन 80 रुपये किलोपर्यंत गुळाने मजल मारली आहे.
विशेष म्हणजे गुळाच्या चहासाठी, आयुर्वेदिक औषधांसाठी, थंडी पडल्याने मेथीच्या लाडूत त्याचा मोठ्या प्रमाणावर वापर होत असल्याने मागणी वाढल्याचे व्यापारी शाह यांनी सांगितले. दर कमी होण्याची सध्यातरी शक्यता कमी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले, तर किरकोळ बाजारात साखरेचे दर दिवाळीत 42 रुपये होते. जानेवारीत साखर 45 रुपये किलोपर्यंत पोहोचली.