पुढारी ऑनलाईन : इर्शाळवाडी दुर्घटनेबाबत आज (दि.२०) उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधान परिषदेच्या सभागृहात निवेदन केले. इर्शाळवाडी दुर्घटना घडल्यापासून ते सध्यस्थितीपर्यंत इंथभूत माहिती त्यांनी सभागृहाला दिली. त्यांनी संपूर्ण घटनाक्रम, घटनास्थिती आणि सध्या सुरू असलेल्या मदतकार्य आणि बचावकार्याचा (Irshalwadi Landslide) आढावा घेतला.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, मौजे चौक-मानिवली, तालुका खालापूर, जिल्हा रायगड या महसुली गावाच्या हद्दीतील इरशालवाडी या ठिकाणी बुधवारी (दि.१९ जुलै) रात्री दरड कोसळली. इर्शाळवाडी हे चौक मानिवली ग्राम पंचायतमधील डोंगरदरीत वसलेली छोटीशी वाडी आहे. ही वाडी उंच दुर्गम अशा डोंगरावरती इर्शाळगडाच्या डोंगर कपारीत वसलेली वाडी आहे. सदर ठिकाणी वाहने जाण्यासाठी रस्ता उपलब्ध नसून, मौजे. चोकमानवली या गावातून पायी चालत जावे लागते. सदर वस्ती तीव्र उतारावर असल्याने त्यामुळे दैनंदिन दळवळण प्रमुख रस्त्याने जोडलेले नाही. हे ठिकाण मुंबई पासून ८० km अंतरावर आहे. दुरध्वनी/मोबाईल ने संपर्क साधने ही कठीण आहे. प्रामुख्याने ठाकर नावाचे आदिवासी समाज या वाडीत राहतो,
वाडीत ४८ कुटुंब वास्तव्यास असून, येथील लोकसंख्या २२८ इतकी आहे. येथे गेल्या ३ दिवसांत (दि.१७ जुलै ते १९ जुलै) ४९९ मीमी पाऊसाची नोंद झाली आहे. बुधवारी रात्री १०.३० ते ११ या दरम्यान घडलेली आहे. या घटनेची माहिती ११.३० च्या दरम्यान जिल्हा प्रशासनास मिळाली. रात्री १२ वाजता राज्य नियंत्रण कक्षास याची (Irshalwadi Landslide) माहिती मिळाली. असेही उपमुख्यमंत्र्यांनी केलेल्या निवेदनात (Irshalwadi Landslide) म्हटले आहे.
इर्शाळवाडी हे ठिकाण भारतीय भुवैज्ञानीक सर्वेक्षण विभागाच्या अहवालानूसार, संभाव्य दरड प्रवण ठिकाणाच्या यादीत समाविष्ट करण्यात आलेले नाही. यापूर्वी ठिकाणी दरड कोसळणे, भूस्ख्लन होणे अशा प्रकरच्या घटना आलेल्या नाहीत. या वाडीत ४८ कुटुंब (२२८ लोकसंख्या) वास्तव्यात होती. त्यापैकी २५ ते २८ कुटुंब बाधीत झालेली आहेत. २२८ पैकी ७० नागरीक स्वत: घटनेच्या वेळीच सुरक्षित असल्याचे प्राथमिक माहिती आहे. २१ जखमी असून त्यापैकी १७ लोकांना तात्पूरत्या बेस कॅम्पमधे उपचार केले आहेत. ६ लोकांना पनवेल येथील MGM हॉस्पिटलमध्ये उपचार दिले जात आहेत. सकाळी १०.१५ मिनिटांपर्यंतच्या अहवालानूसार १० लोकांच्या मृत्यू झालेला आहे. घटनास्थळी उर्वरीत लोकांचा शोध व बचावकार्य सूरू आहे. त्याभागातील माती व दगड व तीव्र उतारावरून कोसळलेली दरडीचे स्वरूप पाहता व सतत पावसाच्या स्थितीमुळे चिखल व ढिगारा घटट दबलेला असल्याने अतिशय दक्षतेने एनडीआरएफच्या देखरेखीखाली स्थानिक ट्रेकचे तरूण एनडीआरफ जवान व सिडकोकडून पाठविलेले मजूर यांच्या मार्फत कार्यवाही सूरू आहे.
पुण्याहून रात्रीच NDRF २ टिम (६० जवान) निघून पहाटे ४ पूर्वी पोहोचले आहेत. तसेच sniffer dog squad सुद्धा घटनास्थळी पोहोचले आहेत. घटनास्थळ हे अतिदुर्गम भागात असल्याने कोणत्याही वाहनाने घटनास्थळी पोहचणे अशक्य असल्याने डोंगर पायथ्याशी तात्पुरते नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आलेला आहे. व तेथील संपर्क क्र. 8108195554 आहे. पनवेल येथील ट्रेकर्स ग्रुप यशवंती ट्रेकर्स व निसर्ग गुपचे नयमित ट्रेक करणारे व त्या परीसरातील भैागोलिक परीस्थिताचे अनुभव असणारे तरुण बचाव पथकात सहभागी झालेले आहेत. हवाईदलाची दोन हेलिकॉप्टर पहाटेपासून सांताक्रुझ हवाईतळावर बचावासाठी तयार आहेत तथापि खराब हवामानामुळे उड्डान घेऊ शकत नाही. स्थानिक प्रशासनाने पायथ्याशी तात्पुरते हेलिपॅड तयार केले असून वातावरण अनुकूल होण्याची वाट पाहत आहेत.
स्थानिक पोलीस प्रशासन, जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त व महसूल व पोलीस खात्याचे क्षेत्रिय अधिकारी घटनास्थळावर आहेत. जेसीबी सारखी यंत्रणा घटनास्थळी नेता येत नसल्याने त्वरीत बचावकार्य होण्याच्या दृष्टीने सिडको व स्थानिक यंत्रणेमार्फत अकुशल मजूर शोध व बचावासाठी आवश्यक साधनसामग्रीसह पाठविण्याची कार्यवाही सूरू आहे. जेणेकरून यंत्रसामग्री अभावी शोध कार्य सुरळीत सुरू ठेवून मलब्याखालील अडकलेल्या लोकांना कमीतकमी वेळेत सुखरूप बाहेर काढता यईल असे प्रयत्न सुरु आहेत. मुसळधार पाऊस व ढगाळ धुक्या सारखी स्थिती असल्याने शोध कार्यास अडथळे येत आहेत. पायथ्यापासून पायी चालत जाण्यासाठी एक ते दीड तासाचा कालावधी लागतो तसेच डोंगर कपारीच्या उतारीची उंची व तिव्रता ही ३० अंशापेक्षा जास्त असल्याने व झाडीझुडपे असल्याने केवळ शारीरीक दृष्टया सक्षम असलेले तरुण डोंगरचढ करू शकतात अशी स्थिती आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री गिरीष महाजन, उदय सामंत, दादा भुसे, अनिल पाटील, कुमारी अदिति तटकरे स्थानीक लोकप्रतिनिधी महेश बाल्डी हे डोंगर पायथ्यापाशी असलेल्या तात्पूरत्या स्थापित केलेल्या नियंत्रण कक्षात उपस्थित राहून योग्य समन्वय ठेवून शोध व बचावकार्य प्रभावीपणे अंमल होईल त्याची दक्षता घेईल. तसेच, कोकण विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी रायगड, जिल्हापरीषद सीईओ, पोलीस अधीक्षक, प्रांत अधिकारी व तहसीलदार हे सुध्दा विविध स्थरावर समन्वय स्थापित करून बचावकार्य सक्रियपणे अंमल करीत आहेत.
रुग्णवाहिका वैद्यकीय पथके घटनास्थळी पासून बेसलाईन पर्यन्त पहाटेच पोहोचली आहेत. वैद्यकीय उपचार पथक चालत जाऊन घटनास्थळी पोहोचले आहेत. घटनास्थळावरील तात्पुरते नियंत्रण कक्ष, तालुका व जिल्हा नियंत्रण कक्ष तसेच मंत्रालय येथील आपत्ती व्यवस्थापन विभाग नियंत्रण कक्षाद्वारे आवश्यक त्या बाबीसाठी सुयोग्य समन्वय व प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. सदरील माहिती ही तालुका व जिल्हा स्तरावरून कार्यरत अधिकाऱ्यांकडून दुरध्वनी व इमेलद्वारे प्राप्त केली असून ही प्राथमिक स्वरुपाची आहे. शक्य तितक्या लवकर ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना सुरक्षित बाहेर काढणे हा प्राधान्याचा विषय आहे व तो प्रभाविपणे अंमल होईल याची दक्षता घेण्यात येत आहे.
शासनाने मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाखांची मदत जाहीर केली असून जखमींच्या उपचाराचा खर्च शासनाकडून करण्यात येणार आहे. मी स्वत: रायगड, पालघर, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, गडचिरोली, पुणे, सातारा, कोल्हापूर, अहमदनगर या जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरुन संपर्क साधला असून आवश्यक त्या खबरदारीच्या उपाययोजना करण्याबाबत सूचना दिल्या आहेत, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभा सभागृहात केलेल्या निवेदनात म्हटले आहे.