पुढारी ऑनलाईन डेस्क : IPL चा आज अंतिम सामना आहे. गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स (GT vs RR Stats Preview) यांच्यात गुजरातमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना रंगणार आहे. आयपीएलच्या पहिलाच हंगामात खेळत असणा-या गुजरात संघाने अंतिम फेरीत धडक मारून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. आता दुसरीकडे 14 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर राजस्थान आयपीएलचा अंतिम सामना खेळणार आहे. आजचा अंतिम सामना अतिशय रोमांचक होईल, अशी क्रिकेट चाहत्यांची अपेक्षा असून आजच्या अंतिम सामन्यात काही मोठे विक्रमही नोंदविले जाऊ शकतात.
जोस बटलरने या हंगामात आश्चर्यकारक कामगिरी केली आहे. बटलरने 4 शतकांसह 824 धावा केल्या आहेत. आता जर तो 25 धावा करू शकला तर तो डेव्हिड वॉर्नरचा विक्रम मोडेल. कोहलीने 2016 मध्ये एका मोसमात सर्वाधिक धावा केल्या होत्या. विराटने ९७३ धावा करत इतिहास रचला. त्याच वेळी, डेव्हिड वॉर्नर अशी कामगिरी करण्यात दुस-या क्रमांकावर आहे. त्याने आयपीएलच्या एका हंगामात 848 धावा काढण्याची कामगिरी केली. 25 धावा केल्यानंतर, बटलर या ऑस्ट्रेलियन दिग्गजांना मागे टाकेल आणि आयपीएलच्या एका हंगामात सर्वाधिक धावा करणारा दुसरा फलंदाज बनेल.
राजस्थानचा फिरकीपटू युजवेंद्र चहलला इतिहास रचण्याची संधी असेल. आज जर चहल विकेट घेण्यात यशस्वी ठरला तर फिरकीपटू म्हणून एका मोसमात तो सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज बनेल. सध्या चहल दक्षिण आफ्रिकेच्या इम्रान ताहिरच्या बरोबरीत आहे. ताहिरने एका मोसमात 26 विकेट घेण्याचा विक्रम केला असून चहलने यंदाच्या हंगामात आतापर्यंत 26 विकेट घेतल्या आहेत. चहल जर 2 विकेट घेण्यात यशस्वी ठरला तर तो अनुभवी अमित मिश्राचा विक्रम मोडेल. मिश्राने आयपीएलमध्ये 166 विकेट घेतल्या आहेत. तर चहलने आयपीएलमध्ये 165 विकेटपर्यंत मजल मारली आहे. म्हणजेच चहलला आयपीएलमध्ये सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत चौथ्या क्रमांकावर येण्याची संधी असेल.
गुजरातचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला आयपीएलमध्ये 100 बळी पूर्ण करण्याची संधी आहे. शमीने आतापर्यंत 98 विकेट घेतल्या आहेत. आज जर शमी आयपीएल फायनलमध्ये 2 विकेट घेण्यात यशस्वी ठरला तर तो आयपीएलमध्ये 100 विकेट्स पूर्ण करेल.
जर फिरकीपटू अश्विन अंतिम फेरीत 1 बळी घेण्यात यशस्वी ठरला तर तो पीयूष चावलाचा आयपीएलमधील विक्रम मोडेल. पियुषने आयपीएलमध्ये आतापर्यंत 157 विकेट घेतल्या आहेत. त्याचबरोबर अश्विनने यावेळी आयपीएलमध्ये 157 विकेट्स घेतल्या आहेत. एका विकेटसह अश्विन आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक बळी घेणारा पाचवा गोलंदाज बनेल. याशिवाय 20 धावा केल्यानंतर अश्विन फलंदाज म्हणून करिअरमध्ये टी-20 क्रिकेटमध्ये 1000 धावा पूर्ण करेल.
जर हार्दिक पांड्या आजच्या सामन्यात गोलंदाजी करत 3 विकेट घेण्यात यशस्वी ठरला, तो आयपीएलमध्ये 50 बळी पूर्ण करेल. आणि जर त्याने फलंदाजीदरम्यान 7 चौकार मारले तर तो आयपीएलमध्ये 150 चौकार पूर्ण करेल.