पुढारी ऑनलाईन डेस्क : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्याबरोबर कोणतेही मतभेद नाहीत. उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पार्टी (सपा) आणि काँग्रेस पक्षात कोणताही वाद नाही. आमची आघाडी होईल. सर्व काही ठीक आहे. तसेच सर्व काही चांगेलच होईल, अशी माहिती 'सपा'चे प्रमुख अखिलेश यादव यांनी आज ( दि. २१ ) दिली.
माध्यमांशी बोलताना अखिलेश यादव म्हणाले की, सपा आणि काँग्रेस पक्षांचे नेते लवकरच संयुक्त पत्रकार परिषद घेणार आहेत. समाजवादी पाटीने त्यांच्या जागा वाटप कराराचा भाग म्हणून काँग्रेसला 17-19 जागा देण्याचे मान्य केले आहे. दरम्यान, प्रियंका गांधी यांनी मध्यस्थी केल्यानंतर आणि अखिलेश यादव यांच्याशी बोलल्यानंतर दोन्ही पक्षांमधील मतभेदांवर पडदा पडला, अशी माहिती सूत्रांनी दिली. काँग्रेसने मुरादाबाद जागेच्या मागणीचा आग्रह सोडला आहे. त्याऐवजी समाजवादी पक्षाने उमेदवार जाहीर केलेल्या सीतापूर, श्रावस्ती आणि वाराणसीची मागणी केल्यानंतर चर्चा कायम राहिली. वाराणसी हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मतदारसंघ आहे. काँग्रेसने सपाला वाराणसी जागेसाठी आपला उमेदवार मागे घेण्याची विनंती केली, असे सूत्रांनी सांगितले.
उत्तर प्रदेशमधील अमेठी, रायबरेली, प्रयागराज, वाराणसी, महाराजगंज, देवरिया, बांसगाव, सीतापूर, अमरोहा, बुलंदशहर, गाझियाबाद, कानपूर, झाशी, बाराबंकी, फतेहपूर सिक्री, सहारनपूर आणि मथुरा या मतदारसंघातून काँग्रेस निवडणूक लढण्याची शक्यता आहे.
समाजवादी पक्षाने 31 जागांसाठी एकतर्फी उमेदवार जाहीर करून काँग्रेसला आश्चर्याचा धक्का दिला होता. समाजवादी पक्षाने बुडौन लोकसभा मतदारसंघातून ज्येष्ठ नेते शिवपाल यादव यांच्या नावची घोषणा केली. शिवपाल यादव हे अखिलेश यादव यांचे काका आहेत. पश्राने वाराणसीमधून सुरेंद्र सिंग पटेल, कैरानामधून इक्रा हसन, बरेलीमधून प्रवीण सिंग आरोन आणि हमीरपूरमधून अजेंद्र सिंग राजपूत यांना उमेदवारी दिली आहे.
सोमवारी, समाजवादी पार्टीने ११ उमेदवार घोषित केले. यामध्ये माफिया मुख्तार अन्सारी यांचा भाऊ आणि बसपा खासदार अफजल अन्सारी यांच्या नावाचा समावेश आहे. 30 जानेवारी रोजी समाजवादी पक्षाने उत्तर प्रदेशातील 16 लोकसभा जागांसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती.