पुढारी ऑनलाईन डेस्क: भारतीय गोलंदाजाच्या भेदक मार्यासमोर पाकिस्तानच्या फलंदाजांचा उडालेला धुव्वा आणि त्यानंतर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने जिगरबाज खेळी करत क्रिकेटप्रेमींची मने जिंकली. त्याने ८६ धावांच्या खेळीत ६ चौकार आणि ६ षटकारांची आतषबाजी केली. ( Rohit Sharma innings)
१९२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाच्या कर्णधार रोहित शर्माने भारताला दमदार सुरुवात करुन दिली. सलामीवीर शुभमन गिल पाठोपाठ आणि विराट कोहली आउट झाल्यानंतरही रोहितने आपली दमदार फटकेबाजीने क्रिकेटप्रेमींची मने जिंकली. त्याने ६ चौकार आणि ६ षटकारांची आतषबाजी करत ६३ चेंडूत ८३ धावांची खेळी करत टीम इंडियाला विजयाच्या उबंरठ्यावर आणले.
( Rohit Sharma innings)
रोहित शर्माने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 300 षटकार पूर्ण केले आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये 300 षटकार मारणारा तो जगातील तिसरा फलंदाज ठरला. पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीच्या नावावर 351 षटकार आणि वेस्ट इंडिजचा माजी सलामीवीर ख्रिस गेलच्या नावावर 331 षटकार आहेत. वन-डे विश्वचषक स्पर्धेतील सर्वाधिक षटकार हे रोहित शर्माच्या नावावर आहेत.
भारताने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. कर्णधार रोहित शर्माचा हा निर्णय भारतीय गोलंदाजाने आपल्या कामगिरीने सार्थ ठरवला. वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज,जसप्रीत बुमराह यांच्यासह अष्टपैलू हार्दिक पंड्याचा भेदक मारा, कुलदीप यादव आणि रवींद्र जडेजाच्या फिरकीच्या जादूसमोर पाकिस्तानचा डाव पत्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला. कर्णधार बाबर आझम आणि स्टार फलंदाज रिझवान या दोघांच्या फलंदाजीच्या जोरावर पाकिस्तानने १९१ धावांपर्यंत मजल मारली होती. ३० षटकांत पाकिस्तानच्या ३ बाद १५६ धावा होत्या. यानंतर अवघ्या ३३ धावांत पाकिस्तानने ६ गडी गमावले. (IND vs PAK World Cup) पाकिस्तानच्या संघ अवघ्या ४२.५ षटकांमध्येच तंबूत परतला. मोहम्मद सिराज,जसप्रीत बुमराह, हार्दिक पंड्या, कुलदीप यादव आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी दोन बळी घेत अवघ्या १९१ धावांवर पाकिस्तानला रोखले. पाकिस्तानचा डाव ४३ व्या षटकांमध्येच संपुष्टात आला.