मुंबई : पुढारी ऑनलाईन
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सामन्याला दुपारी १२ वाजता सुरुवात झाल्यानंतर मयंक अग्रवाल आणि शुभमन गिल यांनी दमदार सुरुवात करून दिली. त्यांनी ८० धावांची सलामी दिली.
मात्र, त्यानंतर भारताचा डाव कोलमडला. जम बसलेला शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा आणि कर्णधार विराट कोहली सलग बाद झाले. कोहली आणि पुजाराला एजाज पटेलने एकाच षटकात बाद करत भारतीय डावाला खिंडार पाडले.
त्यानंतर पहिल्या सामन्यातील हिरो ठरलेला श्रेयस अय्यरही १८ धावांवर परतल्याने भारताची अवस्था ४ बाद १६० अशी झाली. दुसऱ्या बाजूने मयंकने किल्ला लढवताना शानदार शतक झळकावले.