पुढारी ऑनलाईन डेस्क : आंतरराष्ट्रीय व्यासपीठाचा गैरवापर करु नका. प्रथम सीमेपलीकडील दहशतवाद थांबवा. आमच्या भूमीवरील बेकायदेशील ताब्यात घेतलेले प्रदेश तत्काळ रिकामा करा, अशा शब्दांमध्ये संयुक्त राष्ट्र आमसभेत ( युएनजीए) भारताने पाकिस्तानचा खरपूस समाचार घेतला. ( India talks tough with Pakistan at UN )
पाकिस्तानचे कार्यवाहक पंतप्रधान अन्वर-उल-हक ककर यांनी संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत जम्मू-काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला होता. याला प्रत्युत्तर देताना भारताच्या सचिव पेटल गेहलोत म्हणाल्या की, "पाकिस्तान भारताविरुद्ध निराधार आणि दुर्भावनापूर्ण प्रचार करण्यासाठी आतंरराष्ट्रीय मंचाचा गैरवापर करत आहे. भारताविरुद्ध निराधार प्रचार करण्याची पाकिस्तानला सवय लागली आहे. जम्मू-काश्मीर आणि लडाखचा काही भाग हा भारताचा अविभाज्य भाग आहे. भारताच्या देशांतर्गत प्रश्नांवर बोलण्याचा पाकिस्तानला अधिकार नाही."
जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशावर आरोप करण्याआधी जगातील सर्वात वाईट मानवी हक्कांचे उल्लंघन करण्याचा विक्रम पाकिस्तानच्या नावावर आहे. विशेषत: महिला आणि अल्पसंख्याकांच्या हक्कांच्या बाबतीत त्यांनी काळजी घेतली पाहिजे. पाकिस्तानातील अल्पसंख्याकांवरील हिंसाचाराचे उदाहरण ऑगस्ट 2023 मध्ये फैसलाबाद जिल्ह्यातील जरनवाला येथे ख्रिश्चन समुदायावर झालेल्या क्रूरतेमध्ये दिसून येते, जिथे 19 चर्चसह ख्रिश्चनांची 89 घरे जाळण्यात आली होती, असेही गेहलोत यांनी यावेळी स्पष्ट केले.
पाकिस्तानातील अल्पसंख्याक समाजातील महिलांची, विशेषत: हिंदू, शीख आणि ख्रिश्चनांची अवस्था अत्यंत वाईट आहे. नुकताच पाकिस्तानच्या मानवाधिकार आयोगाने एक अहवाल प्रकाशित केला आहे. यामध्ये असे म्हटलं आहे की, देशात दरवर्षी अल्पसंख्याक समुदायातील अंदाजे एक हजारहून अधिक महिलांचे अपहरण होते.जबरदस्तीने धर्मांतर करुन त्याचे लग्न केले जाते. जगातील सर्वाधिक आंतरराष्ट्रीय दर्जाच्या दहशतवादी संघटना आणि व्यक्ती पाकिस्तानमध्ये आहेत, असेही त्यांनी सांगितले.
पाकिस्तानने भारतावर कुरघोडी करण्याऐवजी, मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातील दोषींवर योग्य कारवाई करावी. 26-11 चे बळी १५ वर्षांनंतरही न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. पाकिस्तानने सीमेपलीकडून दहशतवाद पसरवणे थांबवा. बेकायदेशीर आणि जबरदस्तीने भारताच्या ताब्यातील क्षेत्रे रिकामी करावी आणि आपल्या देशातील अल्पसंख्याकांवरील मानवी हक्कांचे उल्लंघन थांबवावे, ही त्रिसूत्री पाकिस्तानने राबवावी, असेही गेहलोत यांनी यावेळी सांगितले.
हेही वाचा :