पुढारी ऑनलाईन डेस्क : खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरची या वर्षी जूनमध्ये गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. या हत्येनंतर भारत-कॅनडा या दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झाला होता. दरम्यान, भारताने कॅनडाला त्यांच्या भारतातील अधिकाऱ्यांना परत बोलवण्याचे आदेश दिले होते. या पार्श्वभूमीवर कॅनडाने भारतापुढे शरणागती पत्करत, आपल्या ४१ अधिकाऱ्यांना परत बोलावले आहे. (India Canada Row)
कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री मेलानी जोली यांनी गुरुवारी (19 ऑक्टोबर) भारतातील कॅनडाच्या अधिकाऱ्यांना बोलावल्याची माहिती दिली. दरम्यान, त्यांनी कॅनडा भारताविरोधी कोणताही बदला घेणार नाही असे देखील स्पष्ट केले आहे. कॅनडाच्या परराष्ट्रमंत्री यांनी सांगितले की, भारताने राजनैतिक अधिकाऱ्यांना शुक्रवारपर्यंत देश सोडण्याचे आदेश दिले आहेत. तसे न केल्यास त्यांचा राजनैतिक दर्जा रद्द करण्यात येईल, असे देखील भारताने म्हटले होते. त्यामुळे कॅनडाकडून पहिल्या टप्प्यात ४१ अधिकाऱ्यांना मायदेशी परतण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच भारताचे हे पाऊल अयोग्य असून, जनैतिक संबंधांवरील व्हिएन्ना कराराचे स्पष्ट उल्लंघन आहे, असे कॅनडाच्या पराष्ट्रमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. (India Canada Row)
कॅनडाच्या परराष्ट्रमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, 'भारताच्या कारवाईमुळे आमच्या राजनैतिक अधिकाऱ्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन, आम्ही त्यांना भारतातून परत बोलावले आहे.' जर आपण राजनैतिक प्रतिकारशक्तीसाठी बनवलेले नियम मोडू दिले तर जगातील एकही राजनैतिक अधिकारी सुरक्षित राहणार नाही. या कारणास्तव, आम्ही भारताच्या कारवाईला कोणतीही प्रतिक्रिया देणार नाही. भारत सोडून गेलेल्या ४१ राजनैतिक अधिकाऱ्यांसोबत त्यांच्या कुटुंबातील ४२ लोकही यामध्ये असल्याचे कॅनडाच्या परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.