![India-Bangladesh](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2023%2F11%2FIndia-Bangladesh.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
पुढारी ऑनलाईन डेस्क : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी आज (दि.१) संयुक्तपणे तीन प्रकल्पांचे उद्घाटन केले. भारतीय-सहाय्यित विकास प्रकल्पांचे दोन्ही देशाच्या पंतप्रधानांकडून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उद्घाटन करण्यात आले. दरम्यान, बांगलादेशची भारतासोबतची भागीदारी ही 'नेबरहुड फर्स्ट' धोरणाचा एक महत्त्वाचा पैलू असल्याचे पीएम मोदी यांनी म्हटले आहे. (India-Bangladesh)
बांगलादेशातील अखौरा-अगरतळा क्रॉस-बॉर्डर रेल्वे लाइन, खुलना-मोंगला पोर्ट रेल्वे लाइन आणि रामपाल येथील मैत्री सुपर थर्मल पॉवर प्लांटच्या युनिट – II या तीन प्रकल्पांचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी भारत-बांगलादेश द्विपक्षीय सहकार्याचे यश साजरे करण्यासाठी आम्ही पुन्हा एकदा जोडले जाणे ही आनंदाची बाब आहे. आमचे संबंध सतत नवीन उंचीवर पोहोचत आहेत. गेल्या ९ वर्षात आम्ही एकत्र काम केले आहे जे याआधीच्या दशकातदेखील केले नव्हते, असे पीएम मोदी यांनी स्पष्ट केले. (India-Bangladesh)
भारत आणि बांगलादेश यांच्यातील तीन विकास प्रकल्पांच्या उद्घाटनाप्रसंगी बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी दोन्ही देशांमधील मैत्रीचे बंध दृढ करण्याच्या भारताच्या वचनबद्धतेबद्दल मी कृतज्ञ आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. (India-Bangladesh)
या प्रकल्पामध्ये मोंगला बंदर आणि खुलना येथील विद्यमान रेल्वे नेटवर्क दरम्यान अंदाजे ६५ किलोमीटरच्या ब्रॉड-गेज रेल्वे मार्गाच्या बांधकामाचा समावेश आहे.अखौरा-अगरतळा क्रॉस-बॉर्डर रेल्वे लिंक प्रकल्प भारत सरकारने बांगलादेशला दिलेल्या ३९२.५२ कोटी रुपयांच्या अनुदानात पूर्ण झाला आहे. भारत सरकारच्या सवलतीच्या कर्ज सुविधेअंतर्गत खुलना-मोंग्ला पोर्ट रेल्वे लाईन प्रकल्प पूर्ण झाला असून त्याची एकूण किंमत ३८८.९२ दशलक्ष आहे. यामुळे सीमापार व्यापाराला चालना मिळेल आणि आगरतळा ते कोलकाता ढाका मार्गे जाण्यासाठी लागणारा वेळही कमी होणार आहे. यावेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी आपल्या भाषणात "सबका साथ, सबका विकास" हा आमचा दृष्टीकोन बांगलादेश सारख्या आमच्या जवळच्या शेजारी मित्रासाठी देखील समर्पक असल्याचे म्हटले आहे.
गेल्या ९ वर्षात, भारताने विविध क्षेत्रातील विकास कामांसाठी अंदाजे १० अब्ज डॉलर्सची मदत दिली असल्याचा उल्लेख करत मोदींनी भारत बांगलादेशचा सर्वात मोठा विकास भागीदार असल्याचा आम्हाला अभिमान वाटत असल्याचे म्हटले आहे. पंतप्रधानांनी गेल्या ९ वर्षांत, प्रवासी आणि माल वाहतुकीसाठी अंतर्देशीय जलमार्ग विकसित केल्याचे सांगत याच मार्गाने बांगलादेशातून त्रिपुराला निर्यातीचा मार्ग खुला झाल्याचे म्हटले आहे. भारत आणि बांगलादेश दरम्यान जगातील सर्वात मोठी क्रूझ – गंगा विलास – सुरू केल्याने पर्यटनाला देखील चालना मिळाली असल्याचे मोदींनी म्हटले आहे. प्रधानमंत्री शेख हसीना यांचे आभार मानत 'स्मार्ट बांगलादेश' पुढे नेण्यासाठी भारत पूर्ण पाठिंबा देत राहील अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावेळी दिली. बांगलादेशमध्ये सार्वत्रिक निवडणुका जानेवारी २०२४ मध्ये होणार आहेत त्या आधी विकास कामांना गती आली आहे. या कार्यक्रमात त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक साहा, परराष्ट्रमंत्री डॉ एस. जयशंकर, अश्विनी वैष्णव, आर. सिंह, किशन रेड्डी हे देखील उपस्थित होते.