दुग्ध क्रांती नव्या वळणावर

दुग्ध क्रांती नव्या वळणावर

जागतिक दुग्धोत्पादनात भारताचा वाटा 24 टक्के आहे. दुधाच्या वाढत्या मागणीमुळे आणि विक्रीमुळे जगभरातील देशांचे लक्ष या व्यवसायावर ताबा मिळवण्यासाठी लागले आहे. जगभरात दूध व्यवसाय करणारी आघाडीची आणि मोठी कंपनी फ्रान्सच्या लॅक्टेलने भारतातील सर्वात मोठी तिरुमला डेअरीला (हैदराबाद) 1,750 कोटी रुपयांत खरेदी केले आहे.

पशुपालन आणि दुग्धोत्पादन मंत्रालयाने देशात दुग्धोत्पादन आणि वाढत्या मागणीबाबत उत्साहवर्धक अहवाल सादर केला आहे. दुग्धोत्पादनात भारत हा पूर्वीपासूनच जगात पहिल्या स्थानावर आहे. जागतिक दुग्धोत्पादनात भारताचा वाटा 24 टक्के आहे. दुधाची उपलब्धता वाढण्याबराबेरच भारतीयांच्या आहारात दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचे प्रमाणही वाढले आहे. सद्यस्थितीत प्रत्येक भारतीय नागरिक दररोज सरासरी 65 ग्रॅमपेक्षा अधिक दुधाचे सेवन करत आहे. ब्रिटिश राजवटीत सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नेतृत्वाखाली धवल म्हणजे दुग्ध क्रांतीचा जन्म झाला होता. गुजरातच्या कैरा भागात धवल क्रांतीची बिजे रोवली गेली आणि स्वातंत्र्यानंतर तो भाग खेडा जिल्हा म्हणून नावारूपास आला. आता त्यास आनंद नावाने ओळखले जाते. ब्रिटिशांच्या काळात पॉल्सन नावाच्या ब्रिटिश कंपनीची या क्षेत्रातील दूध खरेदीवर एकाधिकारशाही होती. कंपनीकडून दूध उत्पादक शेतकर्‍यांचे शोषण केले जात होते. यासंदर्भातील तक्रार शेतकर्‍यांनी सरदार पटेलांकडे केली. पटेल हे गोधन, गायीचे दूध आणि गोदान या हिंदू जीवनशैलीचे पाईक होते. त्यांनी शेतकर्‍यांना कंपनीला दूध विकण्यास मनाई केली. जेव्हा कंपनीला दूध मिळणार नाही, तेव्हा कंपनीला शेतकर्‍यांच्या अटी मान्य कराव्याच लागतील, अशी कणखर भूमिका घेतली. त्यांनी शेतकर्‍यांची सहकारी संस्था स्थापन केली.

त्यानंतर 1946 मध्ये पटेल यांनी मोरारजी देसाई आणि त्रिभुवन दास पटेल यांच्या सहकार्याने भारतात पहिली सहकारी दूध संस्था स्थापन केली. त्यानंतर ती जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ म्हणून ओळखली जाऊ लागली. प्रारंभीच्या काळात दररोज 250 लिटर दुधाचे उत्पादन करणारी ही संस्था आज जगात 'अमूल' नावाने ओळखली जाते. मिशिगन स्टेट विद्यापीठात मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी घेऊन भारतात परतलेले वर्गीस कुरियन यांनी सरकारी नोकरी सोडून या संस्थेचे काम सुरू केले आणि भारताचा पहिले दूध पुनप्रर्क्रिया केंद्र स्थापन केले. त्यानंतर शेतकर्‍यांची मेहनत आणि कुरियन यांचे यांत्रिकी योगदान यामुळे या संस्थेने यशाचे शिखर गाठले. कोणत्याही सरकारी मदतीशिवाय देशातील दूध व्यवसाय हा 70 टक्के असंघटित क्षेत्राकडून होतो. उर्वरित 30 टक्के व्यवसाय हा संघटित क्षेत्राकडे गेला आहे. म्हणजे डेअरीच्या माध्यमातून होतो. देशात दूध उत्पादनात 96 हजार सहकारी संस्था सामील असून 14 राज्यांकडे स्वत:चे सहकारी दूध संघ आहेत.

गेल्या वर्षी 65 लाख टन दुग्धजन्य पदार्थांची निर्यात झाली. केंद्रीय पशुपालन आणि दुग्ध व्यवसाय खात्याचे राज्यमंत्री संजीव बालियान म्हणतात, देशाच्या अर्थव्यवस्थेत डेअरी क्षेत्राचे योगदान 5 टक्के आहे आणि सुमारे आठ कोटी नागरिकांसाठी बारमाही उत्पन्नाचे साधन आहे. दुधाच्या अर्थव्यवस्थेत समृद्धी येण्याचा मार्ग राष्ट्रीय गोकुळ मिशन अस्तित्वात आल्यानंतर खुला झाला. त्याची सुरुवात डिसेंबर 2014 मध्ये झाली. त्याचे ध्येय शास्त्रीय मार्गाने देशी गायींच्या प्रजातींचा विकास आणि संवर्धन करणे. अर्थात, त्याचे परिणाम उपयुक्त ठरले. दुधाच्या वाढत्या मागणीमुळे जगभरातील देशांचे लक्ष या व्यवसायावर ताबा मिळवण्यासाठी लागले आहे. जगभरात दूध व्यवसाय करणारी आघाडीची आणि मोठी कंपनी फ्रान्सच्या लॅक्टेलने भारतातील सर्वात मोठी तिरुमला डेअरीला (हैदराबाद) 1,750 कोटी रुपयांत खरेदी केले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news