पुढारी ऑनलाईन डेस्क : Ashwin-Jadeja Record : भारताची नंबर वन फिरकी जोडी रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा यांनी हैदराबादमध्ये एकत्र इतिहास रचला. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या पहिल्याच दिवशी या दोघांनीही आपले नाव रेकॉर्ड बुकमध्ये नोंदवले. हैदराबादमध्ये इंग्लंडविरुद्ध खेळल्या जात असलेल्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवशी अश्विन-जडेजाने प्रत्येकी तीन-तीन बळी घेतले. अशाप्रकारे ही जोडी आता भारतासाठी सर्वाधिक विकेट घेणारी गोलंदाजी जोडी बनली आहे.
अश्विनने बेन डकेटला (35) बाद करून सामन्यात इंग्लंडला पहिला धक्का दिला. यानंतर जडेजाने ऑली पोपला (1) आपला बळी बनवले. यासह ते भारतासाठी सर्वाधिक कसोटी बळी घेणारी जोडी बनली. (Ashwin-Jadeja Record)
अश्विन-जडेजा जोडीने कसोटीत भारतासाठी 505* बळी घेतले आहेत. याचबरोबर त्यांनी अनिल कुंबळे आणि हरभजन सिंगच्या जोडीला मागे टाकले. या जोडीने भारतासाठी 501 कसोटी विकेट घेतल्या आहेत. या यादीत झहीर खान-हरभजन (474 विकेट) तिसऱ्या, अश्विन-उमेश यादव (471) चौथ्या आणि कुंबळे-जवागल श्रीनाथची (412) जोडी पाचव्या स्थानावर आहे.
इंग्लंडचे वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन आणि स्टुअर्ट ब्रॉड या जोडीच्या नावावर सर्वाधिक कसोटी बळी घेण्याचा विक्रम आहे. या जोडीने 1,039 विकेट घेतल्या आहेत. दुसऱ्या क्रमांकावर शेन वॉर्न आणि ग्लेन मॅकग्रा (1,001) ही जोडी आहे. तर मुथय्या मुरलीधरन आणि चामिंडा वास (895 बळी) तिसऱ्या क्रमांकावर आहेत.
अश्विनने आपल्या कसोटी कारकिर्दीत 96 सामन्यांच्या 180 डावांमध्ये 23.61 च्या सरासरीने आणि 2.76 च्या इकॉनॉमीने 493 विकेट्स घेतल्या आहेत.त्याने 34 वेळा 5 विकेट्स आणि 8 वेळा मॅचमध्ये 10 विकेट घेतल्या आहेत. 59 धावांत 7 विकेट्स ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. तर जडेजाने 69 कसोटींच्या 129 डावांत 24.08 च्या सरासरीने 278 विकेट्स घेतल्या आहेत. त्याने 12 वेळा 5 विकेट्स तर दोन वेळा मॅचमध्ये 10 विकेट घेतल्या आहेत. (Ashwin-Jadeja Record)