पुढारी ऑनलाईन डेस्क : आशिया चषक टी-२० स्पर्धेतील अपयश… त्यापाठोपाठ ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या टी-२० मालिकेतील पहिल्या सामन्यातही पराभव. यामुळे टीम इंडियाचा आत्मविश्वास खचला होता. अखेर दुसर्या आणि तिसर्या सामन्यात दिमाखदार विजय मिळवत टीम इंडियाने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या टी-२० मालिकेवर आपली मोहर उमटवली. ही मालिका ऑस्ट्रेलियात होणार्या टी-२० विश्वचषक स्पर्धेतची रंगीत तालीम मानली जात होती. या सामन्यात विराटची बॅट तळपली. त्याने ४८ चेंडूत ४ षटकार, ३ चौकारांसह ६३ धावा केल्या. मात्र अखेरच्या षटकात विराट बाद झाला. यानंतर विराट ड्रेसिंग रुममध्ये जाताना कर्णधार रोहित शर्मा याने त्याच्या खेळीला मन:पूर्वक दाद दिली. ( IND vs AUS 3rd T20 )
भारतीय फलंदाजीने केलेल्या दमदार कामगिरीमुळे भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-२० मालिकेतील तिसर्या सामन्यात दिमाखदार विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाने १८६ धावांचे आव्हान दिले होते. या धावांचा पाठलाग करताना पॉवर प्लेमध्येच ३० धावांवर भारताचे सलामीवीर रोहित शर्मा आणि केएल राहुल तंबूत परतले. मात्र यानंतर सूर्यकुमार यादव आणि विराट कोहली यांनी धडाकेबाज कामगिरी करत टीम इंडियाचा विजय निश्चित केला.
अखेरच्या षटकात भारताला विजयासाठी ११ धावांची गरज होती. कोहली स्ट्राइकवर होता. ऑस्ट्रेलियागप वेगवाग गोलंदाज डॅनियल सॅम्स दबावात होता. विराटने त्याच्या पहिल्याच चेंडूवर उत्तुंग षटकार लगावला. मात्र यानंतर दुसर्याच चेंडूवर तो झेलबाद झाला. विराट तंबूत परतला आणि मैदानावर काही क्षण सन्नाटा पसरला. मात्र विराटच्या खेळीने भारताचा विजय निश्चित झाल्या होता. त्यामुळेच विराट ड्रेसिंग रुममध्ये जाताना कर्णधार रोहित शर्मा याने पाठ थोपटत त्याच्या खेळीला मन:पूर्वक दाद दिली.
विराट तंबूत परतला. निराश झालेला विराट हा कर्णधार रोहित बरोबर ड्रेसिंग रुमच्या पायर्यावर जावून बसला. हार्दिक पंड्याची साथ देण्यासाठी कार्तिक मैदानात उतरला. त्याने एक धाव करत हार्दिकला स्ट्राइक दिला. भारताला विजयासाठी दोन चेंडूत चार धावांची गरज होती. हार्दिक पंड्याने चौकार फटकावत भारतच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. यावेळी ड्रेसिंग रुमच्या पायर्यावर बसलेले विराट कोहली आणि रोहित शर्माने एकमेकांना गळाभेट देत आनंदोत्सव साजरा केला. कॅमेरामनने हा क्षण टिपला आणि टीम इंडियामधील दोन दिग्गज क्रिकेटपटूंचा आनंदोत्सव चर्चेचा विषय ठरला.