पुढारी ऑनलाईन डेस्क : मुंबई महानगर पालिकेचे (बीएमसी) आयुक्त इक्बाल सिंह चहल यांना आयकर विभागाने नोटीस पाठवली आहे. शिवसेना नेते आणि बीएमसीच्या स्थायी समितीचे सभापती यशवंत जाधव यांच्या प्रकरणी आयकरने ही कारवाई केल्याचे समजते आहे.
खरंतर आयकर विभागाने इक्बाल सिंह चहल यांना ३ मार्च रोजी नोटीस पाठवली होती. त्यांना १० मार्चला उपस्थित राहण्यासंदर्भात सूचना करण्यात आली होती. मुंबई महापालिकेचे स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या प्रकरणासंबंधी ही नोटीस पाठवण्यात आली होती. चहल यांनी त्या नोटीसीला काय उत्तर दिले हे अद्याप समजले नाही.
काही दिवसांपूर्वीच प्राप्तीकर विभागाने यशवंत जाधव यांच्या भायखळा येथील घरावर छापा टाकला होता. आयकर खात्याचे अधिकारी तब्बल ७० तास यशवंत जाधव यांच्या घरी ठाण मांडून बसले होते. यावेळी अधिकाऱ्यांनी अनेक कागदपत्रांची तपासणी केली होती. त्यामुळे आता या प्रकरणात यशवंत जाधव यांच्यावर कोणती कारवाई होणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. याशिवाय, आयकर खात्याने राहुल कनाल, संजय कदम आणि विजय लिपारे या शिवसेनेच्या नेत्यांवरही छापे टाकले होते.
यशवंत जाधव आणि त्यांच्या पत्नी यामिनी जाधव यांनी अवघ्या २४ महिन्यांत मुंबईतील ३६ जुन्या इमारती विकत घेतल्याचा दावा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला काही दिवसांपूर्वी केला होता. या सगळ्याची केंद्रीय तपास यंत्रणांकडून सखोल चौकशी केली जाईल, असेही सोमय्या यांनी म्हटले.
यशवंत जाधव यांनी मुंबईतील किती जुन्या इमारती विकत घेतल्या आहेत, याची यादी समोर आली तर शिवसेनेचे नेते किती मोठे माफिया आहेत, हे सगळ्यांना कळेल, असे सोमय्या यांनी यापूर्वीच म्हटले होते. मात्र, आता किरीट सोमय्या यांनी यशवंत जाधव यांनी नेमक्या किती इमारती विकत घेतल्या याचा आकडा समोर आणला होता.
यशवंत जाधव आणि यामिनी जाधव या दाम्पत्याने दोन वर्षांच्या कालावधीत मुंबईतील ३६ इमारती विकत घेतल्याचा आरोप सोमय्या यांनी केला होता. खरेदी केलेल्या इमारतींमध्ये प्रामुख्याने पगडी चाळी आणि जुन्या इमारतींचा समावेश आहे. यशवंत जाधव यांच्याकडे इतकी संपत्ती असेल तर त्यांच्या नेत्यांकडे किती संपत्ती असेल, असा सवालही सोमय्यांनी उपस्थित केला होता.