नगर : पुढारी वृत्तसेवा : नगर शहरात पूर्वीच्या लोकांना विकासाचे काही देणे घेणे नव्हते. लोकांना विकासच माहीत नव्हता. गेल्या सात ते आठ वर्षांत केंद्र व राज्य सरकारच्या योजना शहरात आणण्यात यशस्वी झालो. आता कुठे लोक विकासावर बोलू लागले आहेत. विकासावर आरोप-प्रत्यारोप होत असल्याने समाधान वाटते, असा खोचक टोला आमदार संग्राम जगताप यांनी विरोधकांना लगावला.
महापालिकेच्या आवारात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सिंहासनारूढ पुतळ्याचे गुरुवारी लोकार्पण करण्यात आले. आमदार संग्राम जगताप, महापौर रोहिणी शेंडगे, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, आयुक्त डॉ. पंकज जावळे, रणरागिणी महिला मंचच्या धनश्री विखे पाटील, उपमहापौर गणेश कवडे, सभापती गणेश कवडे, विरोधी पक्षनेते संपत बारस्कर, सभागृह नेते विनित पाऊलबुद्धे, सुनील त्र्यंबके, सभापती पुष्पाताई बोरुडे, मीनाताई चोपडा, रूपाली वारे आदींसह सर्वपक्षीय नगरसेवक उपस्थित होते.
आमदार जगताप म्हणाले, की महापालिकेच्या आवारात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्यासाठी पहिल्यांदा 2017-18 मध्ये ठराव झाला होता. नंतरच्या काळात वारंवार पाठपुरावा सुरू होता. आज पुतळ्याचे लोकार्पण झाले असून, पुतळा येणार्या पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे. सीना नदीच्या मोजमापासंदर्भात सुरुवातीला 2016 मध्ये अधिवेशनात प्रश्न मांडला. त्यानंतर जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या काळात मोजणी झाली. आता सुशोभीकरणासाठी निधी आणल्याचे आमदार जगताप म्हणाले.
महापौर पदावर बसणार्या प्रत्येक व्यक्तीला वाटते की शहराच्या विकासाला दिशा दिली पाहिजे. कारण शेजारी छत्रपती संभाजीनगर, नाशिक, पुणे ही शहरे विकसित झाली. नगर शहराचा विकास कधी, असा प्रश्न होता. शहराच्या विकासासाठी आपण काही तरी केले पाहिजे. याच हेतूने विधानसभेत गेल्यानंतर केंद्र व राज्य सरकारच्या योजना आणण्यात यशस्वी झालो. 1972 मध्ये पाणी योजना झाली होती. त्यानंतर नवीन पाणी योजना नव्हती. त्यासाठी अमृत पाणी योजना आणली. तसेच फेज टू ही पाणी वितरणाची योजना आणली. त्याचा लवकरच लोकार्पण सोहळा होणार आहे. 60 व 50 लाख लिटर पाण्याच्या टाक्या उपलब्ध झाल्या आहेत. पाणी, कचरा, गटार हे प्रश्न मार्गी लावण्यासाठी यशस्वी प्रयत्न केले. छत्रपती संभाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले पुतळ्यांची कामेही अंतिम टप्प्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. महापौर शेंडगे, उपमहापौर भोसले, सभापती कवडे यांनी मनोगत व्यक्त केले. आयुक्त डॉ. जावळे यांनी प्रास्ताविक केले. उद्धव काळापहाड यांनी सूत्रसंचालन केले. अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रदीप पठारे यांनी आभार मानले.
प्रशासकाचा कारभार माझ्याकडे यावा
नगर शहराला 500 वर्षांपूर्वीचा इतिहास आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा शहराच्या वैभवात भर घालणार महत्त्वाचा पैलू आहे. मनपाचा प्रशासकीय कारभार माझ्याकडे असल्यास सीना नदी अतिक्रमण मुक्त करण्यासाठी प्रयत्न करू. ज्या शहरात नदी वाहते त्या शहराचा विकास होतो. नगरसेवकांनी छत्रपतींचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून काम करावे. शहराचे प्रश्न सोडविण्यासाठी नगरकरांच्या बाजूने उभे राहू, असे आश्वासन जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांनी दिले.
हेही वाचा :