कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : करवीरनिवासिनी अंबाबाई देवीच्या मूर्तीची मंगळवारी सकाळी केंद्रीय पुरातत्त्व विभागाच्या अधिकार्यांनी पाहणी केली. चार अधिकार्यांच्या पथकाने देवीच्या गाभार्यात अर्धा तासाहून अधिक वेळ पाहणी केली. यानंतर देवीच्या मूर्तीची छायाचित्रेही घेण्यात आली. पथकाने पाहणीनंतरचा अहवाल जिल्हाधिकारी तथा देवस्थान समितीचे प्रशासक राहुल रेखावार यांच्याकडे सुपूर्द केला.
प्राथमिक तपासणीत मूर्तीसाठी तातडीने संवर्धनाची आवश्यकता नाही, असे निरीक्षण केंद्रीय पुरातत्त्वच्या अधिकार्यांनी नोंदविल्याचे जिल्हाधिकारी रेखावार यांनी सांगितले.
चुकीच्या रासायनिक संवर्धनामुळे अंबाबाईच्या मूर्तीचे स्वरूप बदलल्याचा आरोप झाला होता. त्यामुळे राज्य पुरातत्त्व विभागाच्या अधिकार्यांनी 28 फेब—ुवारीला अंबाबाई देवीच्या मूर्तीची पाहणी केली होती. राज्य पुरातत्त्व पुणे विभागाचे सहायक संचालक डॉ. विलास वाहने यांनी त्यावेळी दिलेल्या अहवालात मूर्ती सुस्थितीत असून, तत्काळ संवर्धनाची गरज नसल्याचा अहवाल जिल्हाधिकारी रेखावार यांना दिला होता. दरम्यान, याबाबतचा अहवाल केंद्रीय पुरातत्त्व विभागालाही सादर केला होता. जिल्हाधिकारी रेखावार यांनीही केंद्रीय पुरातत्त्व विभागाशी संपर्क साधून चर्चा केली होती. तसेच पत्रव्यवहार केला होता.
सकाळीच पथक दाखल
श्रीमती राजेश्वरी, शिवन्न कुमार, रामनिगम या केंद्रीय पुरातत्त्व विभागाच्या अधिकार्यांसोबत राज्य पुरातत्त्व कोल्हापूर विभागाचे उत्तम कांबळेही सकाळी 8.30 वाजण्याच्या सुमारास अंबाबाई मंदिरात दाखल झाले. देवस्थान समितीतील पदाधिकार्यांसोबत चर्चा केल्यानंतर हे पथक देवीच्या गाभार्यात गेले. येथे श्रीपूजकांकडूनही सविस्तर माहिती घेतली. गेल्या काही दिवसांत श्रीपूजकांना जाणवलेल्या बदलाबाबत चर्चा केली. मूर्तीची सर्व बाजूंनी, सर्व शक्यता गृहीत धरून सूक्ष्म पाहणी केली. तसेच छायाचित्रेही घेतली. 9 वाजून 20 मिनिटांच्या सुमारास पथक गाभार्यातून बाहेर आले. यानंतर त्यांनी जिल्हाधिकार्यांची भेट घेऊन माहिती दिली.
केंद्रीय पुरातत्त्वकडून 2015 साली रासायनिक संवर्धन
केंद्रीय पुरातत्त्व विभागाच्या तज्ज्ञांनी 2015 साली देवीच्या मूर्तीवर रासायनिक संवर्धन प्रक्रिया केली होती. देवस्थान समिती पदाधिकारी, श्रीपूजकांनी देवीच्या मूर्तीवर यापूर्वी झालेल्या रासायनिक संवर्धनाची माहिती अधिकार्यांना दिली. गेल्या काही दिवसांत संस्था, संघटनांची आंदोलने, भाविकांच्या भावना, याचीही माहिती केंद्रीय पथकातील पदाधिकार्यांपर्यंत पोहोचवल्याचे देवस्थानकडून सांगण्यात आले.