![Amit Shah](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2023%2F05%2F%E0%A4%85%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A4-%E0%A4%B6%E0%A4%B9%E0%A4%BE.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
पुढारी ऑनलाईन: Amit Shah : बिहारमधील पाटणा येथे आज (दि.२३ जून) विरोधक एनडीएला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आव्हान देण्यासाठी एकत्र आले आहेत. मात्र, २०२४ मध्ये भाजप ३०० हून अधिक जागा जिंकेल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा एकदा पंतप्रधान होतील, असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी व्यक्त केला आहे. जम्मू काश्मीर येथील सभेत ते बोलत होते.
पुढे बोलताना अमित शहा म्हणाले, मोदी सरकारने आज अनेक विकासात्मक कामे केली. परंतु विरोधकांना केवळ राजकारण करायचे आहे. आज पाटणामध्ये विरोधक केवळ फोटोसेशनसाठी एकत्र आले आहेत. विरोधक एकाच मंचावर एकत्र येत, भाजप आणि पंतप्रधान मोदींना आव्हान देत आहेत, परंतु मी त्यांना सांगू इच्छितो की, कोणाशीही हातमिळवणी करा, पण तुमची एकता कोणत्याही स्थितीत शक्य नाही. एकता झाली तरी तुम्ही एकत्रित जनतेसमोर या. तरीही २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपच ३०० हून अधिक जागा जिंकेल आणि नरेंद्र मोदीच पंतप्रधान होतील हे निश्चित आहे, असा विश्वास देखील गृहमंत्री शहा यांनी व्यक्त केला.
जम्मू काश्मीर विषयी बोलताना ते म्हणाले, एकाच देशात दोन संविधान, दोन पंतप्रधान आणि दोन ध्वज नाही चालणार. आज जम्मू-काश्मीरमध्ये प्रत्येक नागरिकाला ५ लाख रुपयांचा मोफत आरोग्य विमा दिला जात आहे. त्यामुळेच पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली नवे काश्मीर उभारले जात आहे, असे देखील जम्मू काश्मीरमधील सभेला संबोधित करताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटले आहे.