![salman khan](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2022%2F01%2Fsalman-khan-1.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
पुढारी ऑनलाईन डेस्क
अभिनेता सलमान खानच्या धमकीच्या पत्रामागे माझा हात नाही, असा दावा गँगस्टर लॉरेन्स बिष्णोई याने केला आहे. सलमान खान आणि सलीम खान यांना धमकीचे पत्र मिळाले होते. त्यामध्ये तुमचाही सिध्दू मुसेवाला करू, असे लिहिले होते. यानंतर सलीम खान यांनी तत्काळ पोलिस ठाण्यात याची तक्रार नोंदवली होती. यानंतर महाराष्ट्र सरकारने सलमान खानची सुरक्षाही वाढवली होती.
मागील वर्षी लॉरेन्स बिष्णोई याने सलमान खानला हत्येची धमकी दिली होती. या कामासाठी लॉरेन्सने आपला खास साथीदार संपत नेहरा याला मुंबईला पाठविले होते. नेहराने मुंबईत येउन सलमानच्या घराची रेकी केली होती. सलमानला मारण्यासाठी संपतने आपल्या गावातील एका इसमाकडून आरके स्प्रिंग प्रकारची रायफल खरेदी केली होती. मात्र नेमका त्याचवेळी तो पोलिसांच्या जाळ्यात सापडला होता. काळ्या हरणाची शिकार केल्याच्या प्रकरणात सलमान खान हा मुख्य आरोपी होता. बिष्णोई समाजात हरणाला पवित्र समजले जाते. त्यामुळे बिष्णोई सलमानवर चिडला होता आणि यातूनच त्याने सलमानच्या हत्येचा कट रचला होता.
'रेडी' नावाच्या चित्रपटाच्या चित्रिकरणादरम्यान सलमानवर गोळी झाडण्याची योजना होती; पण हा कट यशस्वी झाला नाही. आता सलमानला नव्याने धमकीचे पत्र मिळाल्याने यामागे लॉरेन्सच आहे काय, याचा कसून तपास दिल्ली पोलिस करीत आहेत.