पुढारी ऑनलाईन डेस्क : राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मंगळवारी (दि.७) आमदारांची बैठक घेतली हाेती. या बैठकीला राज्यमंत्री बच्चू कडू उपस्थित राहिले नाहीत. त्यामुळे बच्चू कडू हे नाराज असल्याची चर्चा रंगली होती. याबाबत आज मंत्री कडू यांनी आज भूमिका स्पष्ट केली.
एका वृत्तवाहिनीशी बाेलताना कडू म्हणाले की, मी नाराज नाही तर शेतकरी नाराज आहेत. मी पहिल्यांदा शेतकऱ्याचा पुत्र आहे; मग मंत्री. राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या बाजूने खंबीरपणे उभे राहावे. सरकारने धान, हरभरा खरेदी सुरू करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावर तोडगा काढतील, असे सांगत त्यांनी महाविकास आघाडीसोबतच असल्याचेही या वेळी स्पष्ट केले.
राज्यसभेच्या ६ जागांसाठी शुक्रवारी मतदान होणार असल्याने या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मंगळवारी आमदारांची बैठक घेतली. या बैठकीला शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या आमदारांबरोबरच महाविकास आघाडीला पाठींबा देणारे अपक्ष आणि छोट्या पक्षांचे १३ आमदार हजर होते. मात्र या बैठकीला मंत्री बच्चू कडू यांच्यासह प्रहार जनशक्तीचे आमदार उपस्थित नव्हते. यानंतर बच्चू कडू नाराज असल्याची चर्चा सुरू होती. याबाबत आपली भूमिका स्पष्ट करत कडू यांनी नाराजीच्या चर्चेला पूर्णविराम दिला आहे.
हेही वाचा :