![पत्नीने घरगुती कामे करावीत अशी पतीने अपेक्षा करणे क्रूरता ठरत नाही : दिल्ली उच्च न्यायालय](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2023%2F08%2FDiavorce.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
पुढारी ऑनलाईन डेस्क : जेव्हा एक महिला आणि पुरुष विवाह करतात तेव्हा भावी आयुष्यातील जबाबदार्या एकमेकांच्या सहकार्याने पूर्ण करणे हा त्यांचा मानस असतो. पत्नीने घरगुती कामे करावेत, असे पतीने सांगितले म्हणजे त्या कामाची बरोबरी मोलकरणीच्या कामाशी करता येत नाही, असे यापूर्वीच्या अनेक निकालांमध्येही स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे पतीने पत्नीकडून घरगुती कामाची अपेक्षा करणे ही क्रूरता ठरत नाही, असे निरीक्षण दिल्ली उच्च न्यायालयाच्या सुरेश कुमार कैत आणि नीना बन्सल कृष्णा यांच्या खंडपीठाने नुकतेच नोंदवले. क्रूरतेच्या कारणास्तव घटस्फोट मिळावा, अशी पत्नीची मागणी न्यायालयाने फेटाळली.
जोडप्याचे २००७ मध्ये लग्न झाले. त्यांना २००८ मध्ये एक मुलगा झाला. पतीने दावा केला की, पत्नीच्या भांडणामुळे आणि बेदरकार वागण्यामुळे सुरुवातीपासूनच दोघांमध्ये मतभेद होते. पत्नी घरातील काम करण्यास टाळाटाळ करत होती. अखेर त्याचे वैवाहिक जीवन सुरळीत राहण्यासाठी आईवडिलांपासून वेगळे राहण्याचा निर्णय घेतला. मात्र यानंतर पती नोकरी निमित्त बाहेर राहत असल्याचे कारण देत पत्नी आपल्या मुलासह तिच्या आईवडिलांकडे राहण्यास गेली. यानंतर घटस्फोटाची मागणी केली. कौटुंबिक न्यायालयाने पतीच्या क्रूरतेच्या कारणास्तव पत्नीला घटस्फोट मंजूर करण्यात आला. यानिर्णयाला पतीने दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.
या प्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाने आपल्या निकालात म्हटलं आहे की, वैवाहिक जीवनामध्ये काही टप्प्यावर पती आर्थिक जबाबदाऱ्या उचलतो आणि पत्नी घराची जबाबदारी स्वीकारते. या प्रकरणातील अपीलकर्त्याने (पतीने) प्रतिवादीकडून (पत्नी) घरगुती काम करण्याची अपेक्षा केली,, त्याला क्रूरता म्हणता येणार नाही. तसेच विवाह कायदा 1955 नुसार, पतीच्या क्रूरतेच्या कारणास्तव पत्नीला घटस्फोट मंजूर करण्यात आल्याचा निर्णयही खंडपीठाने रद्द केला.
पत्नीचा पतीच्या आईवडिल यांच्या बरोबर राहण्याचा कोणताही हेतू नव्हता. स्वत: ला आरामशीर राहता यावे म्हणून तिने अनेकदा तिचे वैवाहिक घर सोडले. पतीने स्वतंत्र राहण्याची व्यवस्था करत तिला आनंदी ठेवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला, तथापि, तिने आपल्या पालकांसोबतच राहण्याचा निर्णय घेतला. तिने केवळ तिच्या वैवाहिक जबाबदाऱ्यांकडे दुर्लक्ष केले नाही तर पतीला त्यांच्या मुलापासून दूर ठेवल्याने त्याचे पितृत्व हिरावले, असेही न्यायालयाने आपल्या निकालात म्हटले आहे.