![Amit Shah](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2023%2F05%2F%E0%A4%85%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A4-%E0%A4%B6%E0%A4%B9%E0%A4%BE.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
नागौर; वृत्तसंस्था : क्षमा मागितल्यावरही कन्हैयालाल या गरीब टेलरचे शीर कापणार्या कट्टरवाद्यांचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत काहीही बिघडवत नाहीत; मात्र भगवा रंग पाहिला रे पाहिला की जाम भडकतात, असा घणाघात केंद्रीय गृहमंत्री तथा भाजप नेते अमित शहा यांनी केला. दगडफेक रोखत नाहीत; पण रामनवमी, महावीर जयंतीच्या मिरवणुका ते आवर्जून रोखतात, असेही गेहलोतांना उद्देशून शहा म्हणाले.
काँग्रेसच्या काळात राज्यात अनेक दंगली झाल्या. अलवरला 300 वर्षे जुने शिव मंदिर तोडण्यात आले. सलासरमध्ये राम दरबारावर बुलडोझर चालविण्यात आला. अवैध खाणकामाविरोधात एका संताने आत्मत्याग केला. देशात कुठेही घडल्या नाहीत, अशा गंभीर घटना राजस्थानात काँग्रेसच्या कार्यकाळात घडल्याचे शहा यांनी सांगितले. कुचामन, मकराना आणि परबतसर येथे शहा यांच्या एकापाठोपाठ सभा झाल्या, त्यात ते बोलत होते.
सभास्थळाकडे रवाना होत असताना अमित शहा यांच्या रथात वरून जाणार्या वीजतारा अडकल्या आणि तुटून जमिनीवर पडल्या. रथ त्वरित थांबविण्यात आला आणि अमित शहा यांना अन्य वाहनातून सभास्थळी पाठविण्यात आले. परबतसर येथे ही दुर्घटना घडली.
खनन घोटाळा, सचिवालयात कोट्यवधींचे सोने-रोकड… किती हे? आता तर तपास यंत्रणाही म्हणू लागल्याहेत, कुठे तरी थांबा रे… जेथे हात घालावा, तेथे घोटाळाच निघतो
गेहलोत सरकारने पेपरफुटीत जागतिक विक्रम नोंदविला आहे. आरपीएससीचा प्रत्येक पेपर लिक झाला. दरवर्षी 3 पेपर फुटले. 4 वर्षांत 14 वर पेपर फुटले. काँग्रेसला आपल्या चमच्यांना रोजगार द्यायचा असतो.
उदयपुरात कन्हैयालाल तेली याचा गळा कट्टरपंथी चिरतात… त्याचा व्हिडीओ बनवतात…
गेहलोत काही करत नाहीत, दुसरीकडे कोटामध्ये पीएफआयसारख्या देशविघातक संघटना खुलेआम मोर्चे काढतात.
सोनिया गांधींना जसे राहुल गांधींना पंतप्रधान बनवायचे आहे, तसे अशोक गेहलोतांना त्यांचा मुलगा वैभव यांना लाँच करायचे आहे. राहुल गांधींचे लाँचिंग गेली 20 वर्षे सुरू आहे, वैभवही काही केल्या लाँच होत नसल्याची स्थिती आहे.