पुढारी ऑनलाईन डेस्क : इस्राईल-पॅलेस्टाईन समर्थन यावरुन देशात राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची इस्राईल समर्थनात घेतलेल्या भूमिकेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी टीका केली होती. या टीकेवर भाजप नेते आणि आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी पलटवार केला. त्यानंतर आता राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्री सरमा यांना प्रत्युत्तर दिले आहे. मुस्लिम द्वेष भारतात आणावा, हीच त्यांच्या मनात योजना आहे, अशी टीका आव्हाड यांनी केली आहे.
आव्हाड म्हणाले की, "हिमंता बिस्वा सरमांसारख्या लोकांना गांभीर्याने घेण्याची गरज आहे असे मला वाटत नाही. ज्यांच्या मनात द्वेष आहे आणि आंतरराष्ट्रीय राजकारण म्हणजे काय हे त्यांना माहित नाही. कारण तो संघर्ष पॅलेस्टाईन मुस्लिमांशी संबंधित आहे आणि मुस्लिम द्वेष भारतात आणावा, हीच त्यांच्या मनात योजना आहे. हे युद्ध भारतात ध्रुवीकरणाचा एक प्रकार म्हणून वापरले जात आहे," असी टीका त्यांनी केली आहे.
शरद पवारांच्या विधानावर बोलताना हिमंता बिस्वा सरमा म्हणाले की, "मला वाटते शरद पवार हे सुप्रिया सुळे यांना हमास या दहशतवादी संघटनेसोबत लढण्यासाठी गाझाला पाठवतील."
यावेळी त्यांनी पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीवरही भाष्य केले. ते म्हणाले, मी छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये गेलो आहे. भाजपचे कार्यकर्ते जमिनीवर चांगले काम करत आहेत. आम्ही सहज जिंकू. काँग्रेस नेते राहुल गांधींकडे कोणतीही पात्रता नाही. ते केवळ घराणेशाहीमुळे राजकारणात आहेत, अशी टीकाही त्यांनी केली.
देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्यापासून अटलबिहारी वाजपेयींपर्यंत सर्वच पंतप्रधानांनी इस्रायल-पॅलेस्टाईन संघर्षात (Israel-Hamas War) पॅलेस्टाईनच्या बाजूने भूमिका घेतली. पॅलेस्टाईनला मदत करण्याच्या भूमिकेत बदल झाला नव्हता. आता मात्र वेगळी भूमिका घेतली जात असल्याचे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसची स्वच्छ भूमिका ही पॅलेस्टाईनच्या समर्थनाची असल्याचे शरद पवार यांनी एका कार्यक्रमात स्पष्ट केले होते. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रायलची बाजू घेणे दुर्दैवी असल्याचे त्यांनी म्हटले होते.