Chandrapur Heavy Rain : वरोरा- भद्रावती तालुक्यात अवकाळी पावसासह गारपीट; रब्बी पिके जमीनदोस्त

Chandrapur Heavy Rain
Chandrapur Heavy Rain

चंद्रपूर : पुढारी वृत्तसेवा : चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा आणि भद्रावती तालुक्यात शनिवारी (दि. १० ) रोजी सायंकाळी बहुतांश भागात मुसळधार अवकाळी पावसासह गारपीट झाली. मेघगर्जनेसह १५ ते २० मिनिटे मोठी गारपीट झाल्याने शेतातील रब्बी पिकांचे गहू, चना, ज्वारी रब्बी पिके जमीनदोस्त झाली आहेत. तर बागायती पिकामध्ये मिरची व अन्य पिकांचे अतोनात नुकसान झाले. वरोरा येथे तब्बल १५ तास वीज पुरवठा खंडित झाला. ( Chandrapur Heavy Rain )

संबंधित बातम्या 

हवामान खात्याने शनिवारी, रविवारी आणि सोमवारी रोजी चंद्रपूर जिल्ह्यात येलो अलर्ट घोषित केला होता. शनिवारी दुपारपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण तयार होवून सांयकाळी सात वाजताच्या सुमारास वरोरा आणि भद्रावती तालुक्यातील विविध भागात अचानकपणे मेघ गर्जनेसह अवकाळी पावसासह गारपीटाला सुरुवात झाली. वरोरा येथे २० मिनीटे गारपीट झाली. गारपीटाचा मारा जबरदस्त असल्याने शेतात उभे असलेले रब्बी हंगामातील हरभरा, गहू, चना, ज्वारी पिके जमीनदोस्त झाली. फळबागांची तसेच खरीप हंगामातील उभ्या असलेल्या तूरी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती हाती आली आहे.

त्यानंतर भद्रावती तालुक्यात अर्धा तास अवकाळीने पावसासह गारपिटीने झोडपून काढले. यामध्येही रब्बी व बागायती तसेच फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. रब्बी पीक काही दिवसात हातात येणार असतानाच अवकाळीसह गारपीट झाल्याने पिके जमिनदोस्त झाली आहेत.

१५ मिनटांचा पाऊस; १५ तास वीजपुरवठा खंडित

वरोरा तालुक्यात शनिवारी सांयकाळी सात वाजताच्या सुमारास अचानकपणे अवकाळी पावसाचा तडाखा बसला. गारपीटासह जोरदार पाऊस बरसताच वरोरा शहराला व वीज वितरण कंपनी लागून असलेल्या बोर्डा परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला. पाऊस थांबल्यावर वीजपुरवठा पूर्ववत सुरू होईल अशी आशा असताना कित्येक तास वीजपुरवठा सुरळीत चालू झाला नाही. येथील नागरिक रात्रभर अंधारातच होते. जवळपास १५ तासांच्या प्रतिक्षेनंतर रविवारी सकाळी सव्वा नऊ वाजताच्या सुमारास वीजपुरवठा सुरू झाला. केवळ १५ मिनटांच्या पावसात जर १५ तास वीजपुरवठा खंडित झाल्याने रात्रभर नागरीकांना त्रास सहन करावा लागला.

चंद्रपूर जिल्ह्यात रविवार आणि सोमवारी येलो अलर्ट

चंद्रपूर जिल्ह्यात शनिवारी अवकाळीसह पावसासह गारपीटीने झोडपून काढल्याने पिकांचे नुकसान झाले आहे. हवामान खात्याने रविवारी आणि सोमवारी येलो अलर्ट घोषित केला आहे. काल दिवसभर जिल्ह्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. काही ठिकाणी हलक्या सरी कोसळल्या. जिल्ह्यात एक- दोन ठिकाणी गारपीटीसह पाऊस कोसळण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तर सोमवारी येलो अलर्ट आहे.

येत्या ३ दिवसाच्या बदललेल्या हवामानामुळे रब्बी पिके हातून जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शनिवारी गारपीटीसह अवकाळी पाऊस आणि रविवारी ढगाळ वातावरण, हलक्या सरी बरसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. उद्या सोमवारी पुन्हा येल्लो अलर्ट असल्यानं शेतकरी संकटात सापडला आहे. यावेळी खरिपातील मुख्य पीक धान आणि रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ( Chandrapur Heavy Rain )

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news