पुढारी ऑनलाईन डेस्क: अनेक दिवसांपासून प्रतिक्षेत असलेला मान्सून अखेर बरसायला सुरूवात झाली आहे. मुंबईसह दिल्लीत एकाचवेळी मान्सून सक्रिय झाला असून, येत्या ३ ते ४ तासांत सिंधुदुर्ग, पालघर, मुंबई आणि ठाणे या शहरात मध्यम ते तीव्र स्वरूपाच्या मुसळधार पावसाची शक्यता (Heavy Rainfall) आहे, असे भारतीय हवामान खात्याने म्हटले आहे, असे वृत्त एएनआयने दिले आहे.
मान्सून भारतात दोन शाखेच्या माध्यमातून दाखल होतो. सर्वसामान्या नैऋत्य मान्सून अरबी समुद्रातून भारतातील केरळात सर्वप्रथम दाखल होतो, यंदा मात्र मान्सून बंगालच्या उपसागरातून दुसऱ्या शाखेमार्फत पूर्वेकडील राज्यांमधून भारतात दाखल झाला आहे. दरम्यान मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई भागात गेल्या २४ तासात अनेक ठिकाणी मुसळधार ते अती मुसळधार पावसाची नोंद झाली आहे. तसेच पुढील ४८ तासांत मान्सून संपूर्ण देशात पोहोचणार असून, देशाची राजधानी दिल्ली आणि महाराष्ट्राची राजधाने मुंबईत एकाच बरसणार (Monsoon Update Live) आहे. असे भारतीय हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे.
नैऋत्य मान्सून देशातील बहुतांश भागात सक्रीय झाला आहे. देशात मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, दिल्ली आणि हरियाणा, गुजरात, राजस्थान, पंजाब आणि जम्मूच्या काही भागातही मान्सून दाखल झाला आहे. मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र देखील मान्सूनने व्यापला आहे. त्यामुळे पुढील दोन दिवसात मान्सून आणखी पुढे सरकेल आणि देशातील इतर भाग देखील व्यापेल अशी माहिती भारतीय हवामान विभागाचे संचालक डॉ. मृत्युंजय मोहापात्रा यांनी दिली आहे.