पुढारी ऑनलाईन: देशात मान्सूनच्या दुसऱ्या टप्प्याला सुरूवात झाली आहे. देशभर पावसाने चांगलाच वेग पकडला आहे. देशातील अनेक राज्यात सध्या पूरपरिस्थिती आहे, तर काही राज्यांना या पावसामुळे दिलासा मिळाला आहे. महाराष्ट्रसह छत्तीसगड, ओडिशा आणि पश्चिम बंगालमधील काही भागात आज मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
भारतीय हवामान विभागनुसार, महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे. राज्यातील पुणे, नाशिक, वलसाड, पालघर, नवसारी आणि रायगड या जिल्ह्यात रेड अलर्ट तर, मुंबई आणि ठाण्यात आज ऑरेंज अलर्ट आहे. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पालघर या भागात 40-50 किमी प्रतितास वेगाने वाऱ्यासह तीव्र पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे, या आठवड्यात कोलकत्यासह पश्चिम बंगालमधील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. राज्यातील मच्छिमारांना ८ ते ११ ऑगस्ट या कालावधित समुद्रात न जाण्याचा सल्ला हवामान खात्याने दिला आहे. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजाच्या पार्श्वभूमीवर बंगाल सरकारने किनारी जिल्ह्यांच्या प्रशासनाला सतर्कतेचा इशारा दिला आहे.