पुढारी ऑनलाईन डेस्क : उत्तर भारतातील सात राज्यांमध्ये दोन दिवसांपासून सुरु असणार्या मुसळधार पावासाने ( Heavy rain ) हाहाकार माजवला आहे. या राज्यांमध्ये पूर-भूस्खलनामुळे ५६ मृत्यू झाला आहे. नागरिकांनी पुढील 24 तास घराबाहेर पडू नये, असे आवाहन हिमाचल प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी केले आहे.
दिल्ली, पंजाब आणि हिमाचलसह देशातील उत्तरेकडील राज्यांमध्ये पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या 24 तासांत सात राज्यांमध्ये भूस्खलन आणि पुराच्या वेगवेगळ्या घटनांमध्ये 56 जणांचा मृत्यू झाला आहे.
मनालीमध्ये 52 वर्षांचा पावसाचा विक्रम मोडला गेला आहे. हिमाचलच्या मुख्यमंत्र्यांनी लोकांना पुढील 24 तास घरात राहण्यास सांगितले आहे. राज्यातील अनेक नद्या आणि कालवे धोक्याच्या चिन्हावर आहेत. दोन ठिकाणी ढग फुटले आहेत. कुल्लूमधील बियासबरोबरच पार्वती आणि तीर्थन नद्यांनाही उधाण आले आहे. राज्यातील विविध भागात पाण्याच्या जोरदार प्रवाहात 60 वाहने वाहून गेली. त्याचवेळी कुल्लूच्या कसालमध्ये 6 वाहने पाण्यात वाहून गेली.
पंजाबमध्ये सतलज नदीजवळील १५ ते २० गावे रिकामी करण्यात आली आहेत. त्याचवेळी लेह-लडाखमध्ये मुसळधार पावसामुळे ४५० वर्षे जुने घर कोसळले. हिमाचलमध्ये ४६ घरे उद्ध्वस्त झाली आहेत.
देशातील एकूण पाऊस आता सामान्यपेक्षा जास्त झाला आहे. 9 जुलैपर्यंत सरासरी 239 मिमी पाऊस झाला होता. आता हा आकडा 243 मिमी पर्यंत ओलांडला आहे, जो 2% अधिक आहे.दिल्लीतील पावसाचा 41 वर्षांचा विक्रम मोडला गेला आहे. गुरुग्राममध्ये रस्ते नद्या बनले. यमुनेच्या वाढत्या पाण्याच्या पातळीबाबत सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. ते धोक्याच्या चिन्हाजवळ पोहोचले आहे.