![गूड न्यूज : राज्यातील ‘या’ जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा अंदाज](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2023%2F06%2Frain-1-1-e1688262791110.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
पुढारी ऑनलाईन डेस्क: राज्यातील बहुतांशी भागात पुढील ४ ते ५ दिवस 'यलो अलर्ट' देण्यात आला आहे. त्यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यात पावसाची अधिक शक्यता आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. या संदर्भातील माहिती पुणे वेधशाळेचे प्रमुख डॉ. के. एस. होसाळीकर यांनी दिली आहे.
होसाळीकर यांनी 'X' अकाऊंटवरून केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, बंगालच्या उपसागरात चक्राकार स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे येत्या ४८ तासात बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होत असल्याने, राज्यभरात पुन्हा पावसाची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात वार्यांची चक्रीय स्थिती तयार झाल्याने महाराष्ट्रात मान्सून अंशत: सक्रिय होत असल्याचेही हवामान विभागाकडून वर्तवली आहे.
दरम्यान ३ ते ७ सप्टेंबर या कालावधीत कोकण आणि गोव्यात हलक्या ते मध्यम मेघगर्जना, विजांचा कडकडाटांसह मुसळधार पावसाचा अंदाजही हवामान विभागाने वर्तवला आहे. ५ ते ७ सप्टेंबरच्या कालावधित राज्यातील मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसाची दाट शक्यता असल्याचेही हवामान विभागाने सांगितल्याचे डॉ. होसाळीकर यांनी केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांना मंगळवार ५ सप्टेंबर ते गुरूवार ७ सप्टेंबरपर्यंत यलो अलर्ट देण्यात आला आहे. दरम्यान 'या' जिल्ह्यांना मुसळधारेचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.
पश्चिम महाराष्ट्र – पुणे, कोल्हापूर आणि सातारा
कोकण – रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग
मराठवाडा- लातूर, धाराशिव, नांदेड, हिंगोली, बीड, परभणी, जालाना
विदर्भ- अकोला, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ