पुढारी ऑनलाईन डेस्क : हिमाचाल प्रदेशमध्ये (Himachal Pradesh) शुक्रवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसाने चक्की नदीवरील पूल कोसळला. तसेच पावसामुळे मंडी, चंबा आणि कांगडा जिल्ह्यामधील २० हून अधिक जणांचा मृत्यू तर सहाजण बेपत्ता झाले आहेत. मंडीमधील आठ जण, चंबा मधील तीन, शिमलाच्या ठियोग आणि कांगडा जिल्ह्यामधील चौघा जणांचा मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती आहे.
चक्की नदीवरील पूल पावसाच्या जोरामुळे अक्षरश: पत्त्याप्रमाणे कोसळल्याचे दृश्य पहायला मिळाले. १७ जुलै रोजी पासून पठाणकोट ते जोगिंद्रनगर या मार्गावरील सर्व रेल्वे बंद करण्यात आल्या होत्या. खराब हवामानामुळे मणिमहेश यात्रा दोन दिवसांकरिता स्थगित करण्यात आली आहे. भरमौर – हडसर मार्गदेखील बंद आहे. शनिवारी संध्याकाळ पर्यंत जवळपास २६८ रस्ते, ५०० वीजेचे ट्रान्सफॉर्मर आणि १४० पेयजल योजना बंद पडल्या आहेत. ७९ हून अधिक घरांचे नुकसान झाले आहे. (Himachal Pradesh)
शुक्रवारी रात्री धर्मशाळेत सर्वात अधिक ३३३ मिलीमीटर असा ६४ वर्षांनंतर रेकॉर्डब्रेक मुसळधार पाऊस झाला. हिमाचल प्रदेशमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक मार्ग धोकादायक बनले आहेत. हिमाचल प्रदेशच्या चंबा – पठानकोट महामार्गावर पावसामुळे रस्ता खचल्याने बसचा अपघात होता-होता राहिला आहे. बस दरीत कोसळण्यापासून थोडक्यात वाचल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. पावसामुळे अनेक राष्ट्रीय तसेच राज्या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. नदी, नाल्यांना पूर आल्यामुळे राज्यात पूरस्थिती देखील गंभीर बनली असून, अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.
हेही वाचा