गेल्या आठवड्यात घसरलेल्या पाऱ्याने आता पुन्हा उसळी घेतली आहे. शुक्रवारी (दि.१२) भुसावळ शहराचे तापमान ४५.७ अंश नोंदवले गेले. तर जळगाव शहरात तापमान ४४.९ अंशावर आले आहे. उष्णतेची ही लाट पुढील दोन दिवस कायम राहील, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
जळगाव जिल्ह्यात तापमानाचा पारा वाढायला सुरुवात झाली आहे. गेल्या आठवड्यात ४० सेल्सिअसपर्यंत पाहचलेल्या कमाल तापमानाने शुक्रवारी (दि. १२) ४५.७ अंश सेल्सिअसपर्यंत मजल मारली आहे. आग ओकणारा सूर्य अंगाची लाहीलाही करीत आहे. या रणरणत्या उन्हाच्या तडाख्याने नागरिकांना बेहाल केले आहे. होळी झाल्यानंतर खऱ्या अर्थाने उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. सकाळी १० वाजेपासूनच या तापमानाची जाणीव होऊ लागली आहे. दुपारी बारानंतर अंगाची लाही लाही करणाऱ्या उन्हाच्या झळांचे चटके आता दुपारी ५ पर्यंत पाठलाग करत आहेत. तापमानामुळे दुपारी शहरातील रस्ते ओस पडू लागले आहेत. त्यामुळे कामासाठी दुपारी बाहेर न जाता सांयकाळी ६ नंतर मार्केटमधील गर्दी वाढू लागली आहे.
तीन ठिकाणी उष्माघात कक्ष… वाढत्या उन्हाचा तडाखा अनेकांना बसू शक्यता असल्याने खबरदारीच्या उपाययोजना म्हणून महापालिकेने शहरात तीन ठिकाणी उष्माघात कक्ष सुरू केला आहे. उष्माघात झालेल्यांना तत्काळ उपचार मिळावेत यासाठी महापालिकेने शिवाजीनगर येथे दादासाहेब भिकमचंद जैन रुग्णालयात उष्माघात कक्ष सुरु केला होता. त्यानंतर आता शाहू नगरातील शाहू महाराज रुग्णालय व सिंधी कॉलनीतील चेतनदास मेहता रुग्णालयातही हे उष्माघात कक्ष सुरु करण्यात आल्याची माहिती प्रमुख वैद्यकिय अधिकारी डॉ. रामरावलानी यांनी दिली. अजून एकही रुग्ण येथील कक्षात दाखल नसला तरी तापमानाचा पारा पाहता खबरदारी म्हणून उपाययोजना करण्यात आल्याचे डॉ. राम रावलानी यांनी सांगितले.