पुणे; पुढारी वृत्तसेवा : कोकण भागात आर्द्रतेसह तीव्र उन्हामुळे हीट इंडेक्स (उष्माघातांक) वाढल्याने 14 मेपर्यंत सावधानतेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. कोकणसह मध्य महाराष्ट्र व विदर्भातही आगामी दोन दिवस उष्णतेची लाट कायम राहील. दरम्यान, शुक्रवारी सकाळी मोखा चक्रीवादळाचे महाचक्रीवादळांत रूपांतर झाले, त्यामुळे त्या भागात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे.
चक्रीवादळामुळे राज्याच्या हवेतील आर्द्रता कमी झाल्याने उष्णतेची लाट आली आहे. ही लाट अजून दोन दिवस (14 मे) राहणार असून कोकण, विदर्भ व मध्य महाराष्ट्रात याचा प्रभाव जास्त राहणार आहे. प्रामुख्याने कोकणात 14 मेपर्यंत हिट इंडेक्स वाढल्याने तेथे दोन दिवस अस्वस्थ करणारे हवामान राहू शकते, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
मोखा चक्रीवादळाने वेग घेतला असून दक्षिण पश्चिम बंगालच्या उपसागरात त्याचा वेग सर्वाधिक ताशी 120 ते 130 किलोमीटर इतका वाढला आहे. त्या भागात उष्णतेसह जोरदार पाऊस अशा घटना एकाच वेळी पाहावयास मिळत आहेत. या वादळाने वातावरणातील आर्द्रता शोषून घेतल्याने देशात उष्णतेची लाट सक्रिय झाली आहे. महाराष्ट्रासह गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, ओडिशा या भागांना उष्णतेच्या लाटेचा इशारा शुक्रवारी देण्यात आला आहे.